Narendra Modi : देशभरात गुरुवारपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या उत्सवामध्ये घरोघरी घटस्थापना करण्यात येत असते. तसेच मंदिरांमध्ये देखील देवींची स्थापना करण्यात येत असते. या नवरात्रीमध्ये अनेकजण उपवास करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नऊ दिवस उपवास करतात. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान मोदी हे नवरात्रीचे व्रत करत दरवर्षी माँ दुर्गेची पूजा करतात.

दरम्यान, आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते ठाणे, मुंबई, वाशीममध्ये कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. तसेच सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ९ दिवसांचा उपवास करत असून ते फक्त पाणी पितात. फक्त पाणी पिऊन ते उपवास करतात, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…

यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. मुंबईतील मेट्रो-३ ला महाविकास आघाडीने स्थगिती दिली होती. मात्र, या मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले. पण तरीही त्यांनी स्थगिती दिली. या मेट्रोबाबत सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलं होतं की, पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण उद्धव ठाकरेंचा इगो दुखावला आणि त्यांनी त्या मेट्रोला स्थगिती दिली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं सरकार आल्यानंतर लगेच पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यात आलं”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

कोटींच्या प्रकल्पांचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन

महिन्याभरात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आले आहेत. विदर्भातील कार्यक्रम आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे येथील कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थित जनतेशी मराठीतून संवाद साधला. तसंच, महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय, असं म्हणत त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. दरम्यान, ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पासह छेडा नगर-ठाणे पूर्वमूक्त मार्ग (विस्तारीत) प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यात आले होते. यावेळी जनतेशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले, “कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरगडची आई रेणुका आणि वणीची सप्तश्रुंगी देवी यांना मी कोटी कोटी वंदन करतो. मी ठाण्याच्या धरतीवर कोपिनेश्वर मंदिरच्या चरणी प्रणाम करतो. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनांही नमन करतो”, असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना म्हटलं.