Eknath Shinde Special Session : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. आता राज्याचे विशेष अधिवशन चालू असून त्यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन प्रस्ताव सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“विधानसभेच्या अध्यक्षपदी अॅडवोकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्यानिमित्त त्यांचं अभिनंदन करतो. देवेंद्र म्हणाले होते की मी पुन्हा येईन, ते पुन्हा आले. त्यांचंही पुन्हा अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. अध्यक्ष महोदय म्हणाले नव्हते की मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

असं व्हायला नको होतं…

“गेल्या अडीच वर्षांत राहुल नार्वेकरांनी केलेलं काम आपल्यासमोर आहे. आम्ही म्हणालो होतो की २०० पेक्षा आमदार निवडून आणू नाहीतर शेती करायला जाईन. तोही शब्द आम्ही पूर्ण केला. त्यानंतर दादा आले. त्यामुळे बोनस आला, आम्ही २३७ झालो. लोकशाहीत आपण महायुतीला प्रचंड यश दिलं, विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व सुरू झालं. गेल्यावेळी सभागृहात विरोधी पक्ष चांगल्या कामाला पाठिंबा देत होतं. सरकार चुकत असेल तर कान धरण्याचं काम केलं. आता तर विरोधीबाकावरची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अशाच काळात विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा आली आहे”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

राहुल नार्वेकरांनी अभ्यासपूर्वक निर्णय दिला

“राहुल नार्वेकर साताऱ्याचे जावई आहेत. सातारा माझं गाव आहे. २०२२ मध्ये त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. तो कसोटीचा काळ होता. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची जबाबदारी टाकली होती. अनेक ज्येष्ठ वकिल इकडे यायचे. सर्व कायद्याचा किस पाडायचे, अशा परिस्थितीत अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला. संयम ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आपण दिलेला निर्णय योग्यच होता. कारण जनतेनेही तोच न्याय दिला”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आता निर्जिव यंत्रणेवर आरोप

“लोकसभेला विरोधकांनी बॅलेटपेपरवर फेरमतदान का मागितलं नाही. तेव्हा बुलेटवर सर्वजण स्वार झाले, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. किती राज्य तुम्ही जिंकलात, हरलो की ईव्हीएमवर आरोप करायचा. गेल्या अडीच वर्षांत तुम्ही आमच्यावर आरोप करत होतात, आता त्या निर्जिव ईव्हीएमवर आरोप करत आहात”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde in special session of vidhansabha devendra fadnavis and congratulate rahul narwekar sgk