Eknath Shinde : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या बस प्रवासात दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात गेल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलं. तसेच एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी ५० टक्के सवलत बंद होणार नाही ना? याबाबत अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले. दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या विधानानंतर महिलांना बसच्या प्रवासात ५० टक्के सवलत बंद होणार का? यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. ‘महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बसच्या प्रवासात लाडक्या बहि‍णींना देण्यात आलेली ५० टक्के सवलत बंद होणार नाही. तसेच जेष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत बंद केली जाणार नाही”, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

प्रताप सरनाईक यांचं विधान काय?

“एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आमच्या बहि‍णींना ५० टक्के सवलत, तसेच जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये वर्षांला सवलत आणि त्या सवलतींमुळे परिस्थिती अशी झाली की एसटी बस दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असं वाटतं की एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. त्यामुळे सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही”, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सूट दिल्यामुळे आणि जेष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी महामंडळाला आर्थिक तोटा होत असल्याचं म्हटलं. तसेच आता यापुढे एसटीत कोणत्याही प्रकारची नवीन सवलत मिळणार नाही, असंही मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे एसटीच्या प्रवासात महिलांना दिली जाणारी सवलत बंद होणार नाही का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.