‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. पण, या निर्णयावरून खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला, असं संजय राऊतांनी म्हटलं. यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मंत्री दीपक केसरकर यांनी या आरोपांवरून पलटवार केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “संजय राऊतांवर शरद पवारांनी जबाबदारी सोपवली होती, ती अद्यापही पूर्ण झाली नाही. म्हणून ते असं बोलत असतील. संजय राऊतांनी पूर्ण शिवसेना संपवण्याचा ठेका घेतला होता. परंतु, हा ठेका ते पूर्ण करु शकले नाहीत. संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे नसल्याचं अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं आहे.”
“संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे नाहीतर शरद पवारांचे एकनिष्ठ आहेत. शिवसेना संपण्यासाठी राऊत आणि राष्ट्रवादीचं काय बोलणं झालं, याची माहिती नाही. पण, राष्ट्रवादीच्या वतीने शिवसेना संपण्यासाठी संजय राऊतांनी पूर्ण प्रयत्न केला. शिवसैनिकांनी उठाव केल्यामुळे शिवसेना संपली नाही,” असं दीपक केसरकारांनी सांगितलं.
“शिवसेना दुसऱ्या क्रमाकांवर आली. आज आम्ही पहिला आणि दुसरा क्रमांक पाहत नाही. युती म्हणून एकत्र आहोत. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर तडजोड करणार नाही,” असं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे.