सावंतवाडी : दि.२६ फेब्रुवारी काजूच्या बोंडाला चांगला भाव गोवा राज्यात मिळतो, त्यापासून विविध प्रकारचे मद्यार्क बनविले जाते. मात्र गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बोंडावर प्रकिया उद्योग निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली नाही. दरम्यान सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून बोंडावर प्रकिया उद्योग निर्माण करण्यासाठी सिंधूरत्न समितीचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर सह पाच जण ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गोवा राज्यामध्ये काजू बोंडावर प्रकिया करून मद्यार्क निर्मिती केली जाते. मात्र कोकण किंवा घाटमाथ्यावरील आजरा, चंदगड भागात काजू बोंडे फेकून दिली जातात . काही प्रमाणात गोवा राज्यात बोंडे नेली जातात. यामुळे काँग्रेस सरकारच्या काळात फळप्रक्रिया उद्योगांना १:९ भागभांडवल देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर दोडामार्ग तालुक्यात दोन तर सावंतवाडी तालुक्यात आरोंदा येथे काजू आणि बोंडे प्रक्रिया उद्योग करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. मात्र केंद्र व राज्य सरकारने या तिन्ही सहकारी संस्थांना योग्य पध्दतीने सहकार्य केले नसल्याने ते काजू व बोंडे प्रक्रिया उद्योग निर्माण करू शकलेले नाहीत.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून काजू बोंडावर प्रकिया करण्याची योजना मांडली. सिंधू रत्न योजनेचे कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा आहे. त्यांनी ब्राझील मध्ये बोंडावर प्रकिया होऊन निर्माण होणाऱ्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक दृष्ट्या सक्षमता वाढत असल्याने सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून प्रकिया उद्योग सुरू करण्यासाठी अनुदान मंजूर केले आहे.
काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी ब्राझील चा ब्रँड वापरण्यासाठी सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. ब्राझीलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काजू बोंडूपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांचा अभ्यास करण्यासाठी सिंधू रत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम देवेंदरसिंह, दापोली कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी, आणि शास्त्रज्ञ डॉ. मंदार खानविलकर या पाच जणांची टीम ब्राझीलच्या अभ्यास दौऱ्यावर गेली आहे.
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सिंधू रत्न समृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात विकास व्हावा रोजगार उपलब्ध व्हावा आणि दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सिंधु रत्न योजनेच्या माध्यमातून ब्राझील अभ्यास दौरा करून काजू बोंडे प्रक्रिया उद्योगावर मार्ग काढण्यात येणार आहे सरकारच्या मान्यतेनंतर ब्राझील दौऱ्यावर पाच जणांची टीम २३ फेब्रुवारी ते ३ मार्च त्या कालावधीसाठी गेली आहे. काजूच्या बोंडापासून विविध प्रकारची उत्पादने तेथे तयार केली जातात त्याचा अभ्यास केला जाणार आहे व अशा पद्धतीने काजूचे सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाले पाहिजे म्हणून प्रयत्न केला जात आहे.
सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी काजू बोंडा पासून रस काढण्याच्या अभ्यास करणे व बोंडूचा रस काढून त्यावर प्रक्रिया करणे व उत्पादने तयार करण्याच्या युनिट साठी कोकण कृषी विद्यापीठाला एक कोटी चाळीस लाख रुपयांचा निधी दिला आहे तर काजूच्या बोंडाचा रस काढण्यासाठी लागणारी मशीन खरेदी करिता शेतकऱ्यांसाठी एक कोटी ५० लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बोंडूचा रस मशीनवर काढल्यानंतर तो प्रक्रियेसाठी कृषी विद्यापीठाकडे पाठवला जाणार आहे. रस काढल्यानंतर राहिलेल्या बोंडूचा चोथा फेकून न देता त्यावर प्रक्रिया करून उत्पादने तयार केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात काजूच्या बोंडाला चांगला भाव मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून कोकणात काजू बोंडे वाया न घालवता त्यावर अभ्यास करून प्रकिया उद्योग सुरू व्हावे यासाठी ब्राझीलच्या दौऱ्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.