एनआयटी भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा खासदार संजय राऊतांनी केला आहे. तसंच महाराष्ट्रातील ४० आमदारांना ५० खोके देऊन फोडण्यात आल्याचा आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला असून याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी एसआटीचं रेशन केलं आहे असा टोला लगावला. दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याविषयी विचारणा केली असता राऊतांनी खोचक टोला लगावला. “केंद्र सरकारने नवीन रेशनची पॉलिसी जाहीर केली आहे. गरिबांना रेशन देण्यासंदर्भात. त्यापद्धतीने राज्य सरकारने एसआयटीचं रेशन केलं आहे, म्हणजे मागेल त्याला एसआयटी. महाराष्ट्रात ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता, त्यावर एक एसआयटी स्थापन व्हायला हवी. पण जे विषय पोलीस, सीबीआयनं संपवलेत, त्यावर एसआयटी स्थापन करून तुम्ही सत्तेचा गैरवापर करत आहात. पण आम्ही सगळ्या तपासांना सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही तोंडावर पडाल”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“तुम्ही SIT चं रेशन केलंय, मागेल त्याला..”, संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “तोंडावर पडाल”!

दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर –

“आम्ही दिशा सालियनला न्याय द्यायचा असं म्हटल्याने त्यांना इतकं का लागतं. आम्ही कोणाचं नाव घेतलं आहे का? विधानसभेत एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे,” असं केसरकर म्हणाले.

“खोके घेतल्याबद्दल जे तुरुंगात गेले होते, त्यांनाच त्याचं महत्त्व कळतं. खोके काढायचे असतील तर कोणाचे काढले जातील हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण लोक दुखावले जातील असं काही बोलू नका. तुम्हाला लोकांना प्रेम देता आलं नाही, त्यांना भेटता आलं नाही, त्यांच्या मतदासंघातील कामं करता आली नाहीत. ती कामं कोट्यवधी रुपयाची आहेत. पैसे घेऊन राजकारण करता आलं असतं तर सगळे श्रीमंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले असते. पंतप्रधानही बनू शकले असते,” असंही ते म्हणाले.