मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे अकार्यक्षम होते असा आरोप शिंदे गटाकडून केला जात नसल्याचा खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निर्णयांचा धडाका सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काळामध्ये निर्णय रखडून पडल्याचा आरोप केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर केसरकारांनी उद्धव ठाकरे हे कार्यक्षम मुख्यमंत्री होते मात्र सोबतच्या मित्रपक्षांकडे असणाऱ्या खात्यांमुळे काम रखडल्याचा आरोप केलाय.

नक्की पाहा >> Photos: ‘फडणवीसांच्या पत्नीनेच…’, ‘कागद लिहून…’, ‘गुजरात, गुवाहाटी, गोव्यात…’, ‘फोडाफोडी करून जे..’; पवारांची फटकेबाजी

“अडीच वर्षांचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवलं जात आहे. काल अबदुल सत्तार असतील किंवा आज तुम्ही असाल असं सांगताना दिसताय की आताचे मुख्यमंत्री वेगाने, धडाडीने निर्णय घेत आहेत. लोकांच्या हिताची कामं अडीच वर्षांपासून अडकून पडलेली असं सांगितलं जात आहे. नेमकं अकार्यक्षम कोण आहे?” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर उत्तर देताना केसरकरांनी करोना काळात मोदींप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी आधी करोनाविरुद्धच्या लढाईला प्राधान्य देत चांगला मुख्यमंत्री असल्याचं दाखवून दिल्याचं सांगितलं. मात्र त्याच वेळेस त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांमुळे कारभार रखडल्याचा आरोप केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> …अन् देवेंद्र फडणवीस हसून म्हणाले, “…म्हणून आज दोन माईक ठेवलेत आणि कुठलीही चिठ्ठी नाही”; सभागृहात पिकला एकच हशा

“अकार्यक्षमतेचे आरोप कोणावरही लावलेला नाही असं मला अत्यंत नम्रपणे सांगायचं आहे. मी करोनाच्या काळाबद्दल बोलतोय. करोनावर मात करण्यावरुन पंतप्रधानांचं कौतुक जगभरात झालं तर मुख्यमंत्र्याचंही कौतुक झालं. त्यामुळे एक चांगला मुख्यमंत्री कसा असावा हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं,” असं केसरकर म्हणाले.

नक्की वाचा >> “…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले

पुढे बोलातना त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली. “बरोबर असणाऱ्या पक्षांनीही काम करावं लागतं. मी जे अडीच अडीच वर्ष काम रखडलेली म्हणलो तर ही खाती कोणाकडे होती, तर त्यातील काही खाती राष्ट्रवादीकडे होती, काही काँग्रेसकडे होती. निर्णय घ्यायला उशीर होत होता,” असंही केसरकरांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> आता निवडणुकीच्या रिंगणात शिंदे-भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी?; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद

“आमच्याकडे पर्यटनाला फार वाव आहे. एक कंपनी चार ते पाच हजार कोटींची गुंतवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात करणार होती. एक तर त्यांना वर्ष दीड वर्ष भेटीची वेळच दिली नाही. वेळ दिली तेव्हा त्यांना तीन तास बसवून ठेवण्यात आलं,” असं निर्णयासंदर्भातील उदासिनतेसंदर्भात उदाहरण देताना केसरसरांनी सांगितलं.

नक्की वाचा >> त्या ४० जणांना मनसेमध्ये सामावून घेण्यासाठी राज-फडणवीस भेट? NCP ने शंका उपस्थित करत म्हटलं, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या…”

“असे गुंतवणूक करणारे परदेशी असतात. त्यांना वेळ आणि नियोजन पक्क लागतं. या प्रकरणानंतर हा करार रद्द करा असं ते म्हणत होते. मात्र मी त्यांची कशीबशी समजून घातली. त्यामुळे पुढील बैठक होतील तेव्हा मुख्यमंत्री अशापद्धतीच्या मोठ्या गुंतवणुकीला प्राधान्य देतील,” असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला.

नक्की वाचा >> “त्यात केसरकरांचा नंबर सगळ्यात वर”; शरद पवारांनी शिवसेना फोडल्याचा आरोप, राणेंसोबतच्या वादावरुन शिवसेनेचा टोला

“४० हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार होती. त्यावेळेचे मुख्यमंत्री असणाऱ्या फडणवीस यांनी लगेच वेळ दिली. मात्र सचिवांकडे गेल्यानंतर त्यांना तासभर उशीर झाला. दुसऱ्या दिवशी तो प्रकल्प विशाखापट्टणमला गेला. दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्यांचा त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत ब्रेकफास्ट झाला. जग एवढं प्रगत आणि वेगवान झालं आहे की आम्ही गतीशीलता नाही ठेवली तर महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणुकीच्या घोषणा होतील पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार नाही. त्यामुळे ही कोणावर टीका नाही. आम्ही अडीच वर्षांमध्ये शिकलेलो आहोत. आम्ही शिकलेल्यामधून पुढे जात वेगाने निर्णय घेतले पाहिजेत असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं धोरण आहे,” असंही केसरकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak kesarkar say uddhav thackeray was good cm but work halt due to departments with congress and ncp scsg