Devendra Fadnavis छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती. काँग्रेसने आपल्याला इतकी वर्षे चुकीचा इतिहास शिकवला असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला. या सगळ्यावर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उत्तर दिलं आहे. तसंच लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं.

लाडकी बहीण योजना कुणाची?

लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशातली आहे हे बरोबर आहे. त्याबाबत शिवराज सिंग चौहान यांनी आमच्याशी चर्चा केली. आमची बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शिवराज सिंग चौहान सांगत आहेत तशी योजना आपणही सुरु करु, त्यानंतर तो निर्णय आम्ही घेतला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यामध्ये कुठलीही श्रेयवादाची लढाई आमच्यात नाही असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. तसंच सूरत लुटली या वक्तव्यावर त्यांनी विरोधकांना जोरदार उत्तर दिलं आणि शरद पवारांनाही सवाल विचारला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी माणूस, महाराष्ट्र आणि तमाम हिंदू समाजाचं अराध्य दैवत आहेत. ज्यावेळी आपल्या दैवताची मूर्ती भंगते त्यावेळी जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवप्रेमींना राजकोटचा पुतळा पडल्याने झालं. यातला विषय इतकाच आहे की ज्या प्रकारे राजकारण करण्यात आलं ते दुर्दैवी आहे. पुतळ्या पडल्यानंतर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. मी विरोधी पक्षाकडे पाहतो तेव्हा त्यांना दुःख किती झालं आणि राजकीय संधी किती साधली हा प्रश्न पडला. मला त्यात राजकीय संधीच दिसली.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले. टीव्ही ९ मराठीच्या कॉनक्लेवमध्ये देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

हे पण वाचा- Indrajit Sawant: “छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलं नाही”,फडणवीसांचे विधान; इंद्रजित सावंत म्हणतात…

सूरत लुटीच्या वक्तव्यासंदर्भात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली हे म्हणणं चुकीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेवर दोनदा स्वारी केली. अल्लाउद्दीन खिलजी जे करतो त्याला लुटली म्हणतात, अब्दाली, तैमूर लंग यांनी जे केलं त्याला लूट म्हणतात. महाराजांनी तिथल्या सामान्य माणसांना हात तरी लावला का? शिव इतिहासकारांनी माध्यमांना सांगितलं की महाराजांनी पत्र दिलं होतं मुघलांचा खजिना आहे, तुम्ही तीन वर्षे युद्ध चालवलं, त्यासाठी इतका खर्च आला. तुम्ही हा खर्च द्या अन्यथा मी स्वारी करेन. शिवरायांनी एक प्रकारे त्यांना नोटीसच पाठवली होती. खजिना वसूल केला, त्यानंतर महाराजांनी पावती दिली. याला लूट म्हणतात? आपल्या बापाला लुटारु म्हणणारे हे कोण लोक आहेत? महाराजांनी कधीही सूरत लुटली नव्हती. हे तेच लोक आहेत जे सांगत आलेत १८५७ ची लढाई स्वातंत्र्यसमर नव्हतं तर शिपायांचं बंड होतं. कशाचं शिपायांचं बंड? ती पण स्वातंत्र्याची लढाईच होती. तर महाराजांनी स्वराज्यासाठी सूरतवर स्वारी केली. महाराजांना लुटारु म्हणणं चुकीचं आहे. ” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

शरद पवारांना महाराजांना लुटारु म्हणणं मान्य आहे का?

शरद पवार म्हणाले की तुम्ही चुकीचा इतिहास सांगता, असं विचारल्यावर फडणवीस म्हणाले की, “शरद पवारांना हे मान्य आहे का? महाराजांना लुटारु म्हणणं ? माझा राजा लुटारु नव्हता. माझ्यावर कितीही टीका करा मी ते मान्य करणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठाला स्पर्श करु नका असं महाराजांनी सांगितलं होतं. कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा दरबारात आणली तेव्हा तिला सन्मानाने घरी पाठवलं. अशीच अमुची आई असती सुंदर रुपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती असं शिवाजी महाराज म्हणाले होते. त्यांना लुटारु म्हणता? लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.