उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीवर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटी किंवा त्याहून अधिक निधी मंजूर केला. यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. याबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (२३ जुलै) माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांनाच निधी दिलेला नाही. भाजपा-सेनेच्या नेत्यांनाही दिला आहे आणि इतरही काही आमदारांना दिला आहे. सर्वांना हा निधी दिला आहे. त्यामुळे केवळ अजित पवारांबरोबर आलेल्या आमदारांना निधी दिला असं म्हणणं योग्य होणार नाही.”
“महिनाभरात होणारा पाऊस दोन-तीन दिवसात होतोय”
अतिवृष्टीवर बोलताना फडणवीस म्हणाले, “राज्याच्या विविध भागात सातत्याने अतिवृष्टी सुरू आहे. काही ठिकाणी १५ दिवसात किंवा एका महिन्यात जितका पाऊस आला पाहिजे तितका पाऊस दोन ते तीन दिवसात पडत आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा तेवढा निचरा होत नाही आणि पाणी जमा होतं. त्यातून बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.”
हेही वाचा : ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांवर निधीवर्षांव; अर्थमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारताच अजित पवारांकडून खास तरतूद
“अतिवृष्टीचा तंतोतंत अंदाज येणं कठीण”
“आपण सगळीकडे अलर्ट दिले आहेत. जिथे अतिवृष्टी होणार आहे तिथे उपाययोजना केल्या जात आहेत. एसडीआरएफ किंवा एनडीआरएफ आवश्यकतेनुसार वेळेत पोहचत आहे. बचाव कार्य सुरू आहे. अतिवृष्टीचा अंदाज आला, तरी तो किती मोठ्या प्रमाणात आहे हा तंतोतंत अंदाज येणं कठीण असतं. त्यामुळे अनेकदा अपेक्षापेक्षा अधिक पाऊस पडलेला पाहायला मिळतो,” अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
हेही वाचा : अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीवर्षाव; जयंत पाटील म्हणाले, “राज्याचा अर्थमंत्री म्हणून…”
“पिकांच्या नुकसानीवरही सरकारचं लक्ष”
“कुठल्याही परिस्थिती एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन काम करत आहे. पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीवरही सरकारचं लक्ष आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.