Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपा पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे या वक्तव्याची आता चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी ते कुठलीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका.” असा सल्ला देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

राज्यातील ३ कोटीपेक्षा जास्त लोक सरकारी योजनांचे लाभार्थी

राज्यातील ३ कोटींपेक्षा जास्त लोक हे सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत. सरकारने जी कामं केली त्यामुळे लोक आपल्याबरोबर आहेत. या सगळ्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंचा जनाधार संपल्याचीही टीका केली.

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला

“उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे. त्यामुळेच त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचवले जात आहेत. मराठी आणि हिंदू मतं त्यांच्या बरोबर नाहीत. राज्यात आपलंच सरकार येईल ही स्थिती आहे. मात्र अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका.” असंही आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी केलं. Tv ९ मराठीने हे वृत्त दिलं आहे.

अमित शाह यांचं भाजपाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाचा इतिहास आणि निस्पृह वृत्तीविषयी सांगितले. एक काळ असा होता की लोकसभेत आपल्या फक्त दोन जागा होत्या, त्यावेळीही आपला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. हा आपला इतिहास आहे, असं अमित शाह म्हणाले. ऐंशीच्या दशकातील कार्यकर्त्यांना माहिती असायचे, आपण निवडणूक हरणार आहोत, तरीही काळजी नव्हती. आपण राजकारणात महान भारताच्या रचनेसाठी आलो आहोत, पंतप्रधान किंवा कुठल्याही पदासाठी नव्हे. सरकार येते व जाते, पक्ष निती व विचार सोडतात, आपले सरकार १० वर्षे चालले पण आपण विचार किंवा निती सोडली नाही.

काश्मीर आपला आहे हे, विरोधात असतानाही आपण बोलत होतो. तेव्हा आपले सरकार येईल असे कुणाला वाटले होते का? पण आपले सरकार आले व कलम ३७० आपण हटवले. राम मंदिर होईल असे कुणाला वाटले होते का? पण भूमिपूजन नव्हे तर मंदिर पण तयार केले. आज ‘जय श्रीराम’ हक्काने म्हणत आहोत, असे अमित शाह यांनी सांगितले.