Devendra Fadnavis : महाराष्ट्राचं राजकारण हे नव्या वळणावर आलं आहे. लवकरच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर होईल. २०१९ च्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना होता. यावेळी परिस्थिती तशी नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. दोन्ही पक्षांचा एक एक भाग सत्तेत आणि विरोधात आहे. लोकसभा निवडणुकीत ३० जागा जिंकल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक तर तू राहशील किंवा मी राहिन असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना खुलं आव्हान दिलं होतं. आता या आव्हानाला प्रतिआव्हान देऊन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी ३१ जुलैच्या दिवशी मुंबईतल्या रंगशारदा या ठिकाणी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना जोरदार आव्हानही दिलं. “मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन करुन उभा राहिलो आहे. मी तडफेने उतरलो आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहिन. गीतेमध्येही हेच आहे. अर्जुनाने पाहिलं की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या. मलाही यातना होत नसतील का? पण भाजपा म्हणजे चोर कंपनी आहे.” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. तसंच उद्धव ठाकरे असंही म्हणाले होते की आपल्यासाठी हे शेवटचं आव्हान आहे, त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कुणीही राहणारं नाही. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही तर तळपती तलवार आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना विचारलं असता त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis: “काही तडजोडी मनापासून आवडत नसूनही कराव्या लागतात, आम्ही त्या केल्या”, अजित पवार गटाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

उद्धव ठाकरे आणि तुमच्यातला वाद विकोपाला गेला आहे. मध्यंतरी त्यांनी तुम्हाला आव्हानही दिलं की तू राहशील किंवा मी राहिन याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले, “उद्धव ठाकरेही राहतील आणि मी पण राहिन. कोण कुठे जाणार आहे? राजकारणात कुणीही कुणाला संपवू शकत नाही. हां जनता मात्र राजकीयदृष्ट्या तुम्हाला संपवू शकते. त्याशिवाय कुणीही काहीच करु शकत नाही. उद्धव ठाकरेंना वाटत असेल तर त्यांनी मला राजकीयदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करुन बघावा. जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठिशी आहे तोपर्यंत कुणीही मला राजकीयदृष्ट्या संपवू शकत नाही. मला तुम्ही अभिमन्यू म्हणालात पण मी सांगू इच्छितो की मी आधुनिक अभिमन्यू आहे. मला चक्रव्युहात शिरणंही ठाऊक आहे आणि तो भेदून बाहेर कसं यायचं हे देखील माहीत आहे. तो चक्रव्यूह भेदून दाखवेन. अभिमन्यू कौरवांच्या विरोधात लढला होता, मी देखील कौरवांच्या विरोधातच लढतो आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मध्ये हे वक्तव्य केलं आहे.