महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचा भल्या सकाळी झालेला शपथविधी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली उभी फूट अशा अलिकडच्या काही वर्षांत घडलेल्या घटनांवरून मोठं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी यासंदर्भात वेगवेगळे दावे केल्यानंतर त्यावरूनही आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी आता एक मोठा दावा केला आहे. २०१४ साली ते राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यासाठी तेव्हा युती तुटलेली शिवसेनाच कारणीभूत ठरल्याचं ते म्हणाले आहेत. त्यातही ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या एका आग्रहामुळेच हे सगळं घडून आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता’च्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक राजकीय घडामोडी व डावपेचांवर भाष्य केलं. यावेळी २०१४मध्ये नेमकं काय घडलं होतं, याबाबत त्यांनी भाष्य केलं. एकीकडे ठाकरे गटाकडून २०१४ साली भाजपानंच युती तोडल्याचे दावे केले जात असताना आता देवेंद्र फडणवीसांनी तो दावा फेटाळून लावत शिवसेनेनंच युती तोडल्याचा दावा केला आहे. तेव्हा भाजपात असणारे एकनाख खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन युती तुटल्याचं जाहीर केलं होतं. पण त्यामागे नेमकं कोण कारणीभूत ठरलं, याविषयी आता दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

२०१९ साली मुख्यमंत्रीपदावरून महाराष्ट्रात युती तुटल्याबाबत भाष्य करतानाच २०१४ साली युती तुटल्यामुळेच आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळाल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “महाराष्ट्रात युतीचे राजकारण अपरिहार्य असले, तरी शिवसेनेने केवळ चार जागांसाठी २०१४ मध्ये भाजपबरोबरची युती तोडली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याआधी उद्धव ठाकरेंनी तेव्हा युती भाजपानं तोडल्याचा दावा केला होता. एकनाथ खडसेंना युती तोडण्यास सांगण्यात आलं, असंही ठाकरे म्हणाले होते.

पुरेसं संख्याबळ असताना अजित पवारांची गरज का लागली? देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा; म्हणाले, “शरद पवारांनी…”

“आदित्य ठाकरेंनी १५१ जागांचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं”

“शिवसेनेला १४७ जागा देऊन आम्ही १२७ जागा लढण्यास तयार होतो. पण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी १५१ जागा लढविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेने युती तोडली. त्यातून आम्हाला आमची राज्यातील ताकद समजली. मलाही त्याचा व्यक्तिगत फायदा झाला व मी मुख्यमंत्री होऊ शकलो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“शिवसेनेच्या हट्टापायी मला मुख्यमंत्रीपद मिळालं”

“जास्त जागा लढल्याने भाजपाचे अधिक उमेदवार निवडून आले होते. जर शिवसेनेबरोबर आम्ही लढलो असतो, तर भाजपाला कमी जागा मिळाल्याने त्यांच्यापेक्षा आमचे कमी उमेदवार निवडून आले असते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला असता. शिवसेनेच्या हट्टापायी मला मुख्यमंत्रीपद मिळाले. खरे तर मी त्यांचे आभारच मानतो”, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

येत्या सोमवारी महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. देशभर सात टप्प्यांत मतदान होत असून इतर राज्यांमधील मतदारसंघांमध्येही यावेळी पाचव्या टप्प्याचं मतदान होईल. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेतेमंडळी शेवटच्या टप्प्यातील १३ मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांपैकी या टप्प्यात सर्वाधिक मतदारसंघ असल्यामुळे नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावपळ दिसत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis mocks aaditya thackeray shivsena amid loksabha election 2024 pmw