Devendra Fadnavis on Ajit Pawar: सुमारे दीड वर्षापूर्वी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाशी हातमिळवणी केली. अजित पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. लोकसभा निवडणुका तिघांनी महायुती म्हणून एकत्र लढल्या. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाही एकत्र लढण्यासाठी तिन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. मात्र, यादरम्यान अजित पवार गटासंदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फक्त एक जागा जिंकता आली. त्यामुळे महायुतीतील त्यांच्या भवितव्याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी केलेलं एक विधान आता चर्चेत आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षासह महायुतीची मोठी पीछेहाट झाली. महायुतीला राज्यात १७ जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला युतीमध्ये घेण्याचा निर्णय योग्य होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली होती. आता यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांच्या महायुतीतील समावेशाबाबत विचारणा केली, तेव्हा काही तडजोडी तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून आवडत नसल्या, तरी कराव्या लागतात, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी सर्वकाही सांगितलं आहे. आता फक्त इतरांना सांगायचं बाकी आहे. मी एवढंच सांगेन की हे नक्की आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतलं तेव्हा आमच्या मतदारांना हे अजिबात आवडलं नाही. पण आम्ही जेव्हा परिस्थिती त्यांच्यासमोर ठेवली, ते आमच्यासोबत कोणत्या परिस्थितीत आले, कोणत्या परिस्थितीत आम्ही त्यांना सोबत घेतलं हे आम्ही लोकांना सांगितलं तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की राजकारणात अनेकदा अशी स्थिती येते जेव्हा आपल्याला तडजोडी कराव्या लागतात. तुम्हाला किंवा तुमच्या लोकांना मनापासून ज्या तडजोडी करायला आवडत नाहीत, अशा तडजोडी तुम्हाला कराव्या लागतात. आम्ही तशा तडजोडी केल्या. पण आज आम्ही आमच्या १०० टक्के नाही, पण किमान ८० टक्के लोकांना समजावून देऊ शकलो आहोत की आम्ही हे का केलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित तपवारांच्या बाबतीत कोर्स करेक्शन?

दरम्यान, अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर झालेल्या नुकसानावर वेगळा विचार करून त्यात सुधारणा करण्याचा अर्थात ‘कोर्स करेक्शन’चा विचार आहे का? अशी विचारणा केली असता तसा कोणताही विचार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

“आता कोर्स करेक्शनची वेळही नाही आणि ते करणंही योग्य नाही. जो कोर्स चालू आहे, त्याच कोर्सला सामोरं जावं लागेल. आम्हा तिन्ही पक्षांना एक वास्तववादी दृष्टीकोन ठेवावा लागेल. अशावेळी आम्ही फक्त आकड्यांवर जाऊन चालणार नाही. जिंकण्याची शक्यता फार महत्त्वाची असते. शिवाय लोकांचं तुमच्याबद्दलचं मत म्हणजे आपण कमी किंवा जास्त जागा घेतल्या तर लोक आपल्याबद्दल काय बोलतील? हा दुसरा घटक आहे. आम्ही असा प्रयत्न करतोय की आमच्याबद्दलच्या मतावर कमी काम करून जिंकण्याच्या शक्यतेवर जास्त काम करावं. जर त्यात आम्ही यशस्वी ठरलो तर कोर्स करेक्शनची गरजच नाही. आम्ही चांगल्या तऱ्हेनं विजय संपादित करू”, असं ते म्हणाले.

शिंदे गट, अजित पवार गटाची साथ मिळाली नाही?

दरम्यान, शिंदे गट व अजित पवार गटाशी युती करूनही त्यांची मतांच्या रुपात साध लोकसभा निवडणुकीत मिळाली नाही का? अशी विचारणा केली असता फडणवीसांनी महत्त्वपूर्ण विधान केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

“एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली. त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली. पण एक बाब लक्षात ठेवावी लागेल. हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक त्यांचा मतदारवर्ग तयार करण्याची होती. त्यातून मतं आमच्याकडे हस्तांतरित करणं कठीण काम होतं. आमच्यासाठी ते कठीण काम नव्हतं. आम्ही स्थिर पक्ष होतो . त्यामुळे आमची मतं आम्ही त्यांच्याकडे वळवू शकलो. विधानसभेत मात्र हे होणार नाही. विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.