Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणासंदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. तसेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं.

देशाच्या राजकारणाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातील विरोधी पक्षाबाबत बोलताना टीका केली. केंद्रातील विरोधी पक्ष प्रगल्भ नसल्याचं त्यांनी म्हटलं. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना भारताचं राजकारण दिवसेंदिवस बदलंतय? भारताच्या सध्याच्या राजकारणाच्या स्थितीबाबत तुमचं मत काय आहे? असा प्रश्न विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचं विधान केलं. “आज केंद्रात शरद पवार यांच्यासारखे नेते प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती”, असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जयंत पाटील यांच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “असं आहे की आपली लोकशाही प्रगल्भ होत आहे. सध्या भारताच्या राजकारणात एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. लोक एकप्रकारे निर्णायक मतदान करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता एक गोष्ट महत्वाची आहे की लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणं महत्वाचं आहे. लोकशाही जर आणखी प्रगल्भ करायची असेल तर सत्तारुढ पक्षाबरोबर विरोधी पक्ष देखील प्रगल्भ असला पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

“आता सांगायचं झालं तर आज समजा तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुमच्या सारखे लोक किंवा शरद पवार यांच्यासारखे लोक जर केंद्रात प्रमुख विरोधी असते तर कदाचित प्रगल्भता दिसली असती. मात्र, आज दुर्देवाने केंद्रात विरोधी पक्षात ती प्रगल्भता दिसत नाही. विरोध करताना आपण अशा शक्तींच्या हाती पडतो आहोत का की ज्या शक्तींना भारताची प्रगती नको आहे. ज्या शक्ती अदृश्य काम करतात, अशा शक्तींची मदत आपण घेत आहोत का? या सर्व गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सध्या कोणती आवश्यकता असेल तर प्रगल्भ विरोधी पक्षाची आहे”, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले?

नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.