Devendra Fadnavis On Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडली होती. या घटनेत आता सीआयडीने न्यायालयात नुकतंच दोषारोपपत्र दाखल केलं. या दोषारोप पत्रामधून अनेक खुलासे समोर आले आहेत. मात्र, वाल्मिक कराडवर आधी दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या प्रकरणावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी एक गंभीर आरोप केला होता. पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या ‘सातपुडा’ या सरकारी बंगल्यावर एक बैठक झाली होती. त्यातील ५० लाख रुपये रक्कम निवडणुकीपूर्वीच देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धस यांनी केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. दरम्यान, आमदार सुरेश धस यांनी केलेल्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मोठं भाष्य केलं आहे. धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या बंगल्यावर खरंच खंडणीसाठीची बैठक झाली होती का? याविषयी धनंजय मुंडे यांची चौकशी का होत नाही? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तुमच्या पक्षाचे लोक असा आरोप करत आहेत की खंडणीची बैठक धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. यामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं म्हणून विरोधक मागणी करत आहेत. असं असताना धनंजय मुंडे यांची चौकशी का होत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला असता यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पहिली गोष्ट अशी आहे की हे काम अतिशय प्रोफेशनली झालं. आता केंद्र सरकारने जो नवा कायदा बनवलेला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहितानुसार पहिल्यांदा खंडणीची जी केस असते तेव्हा जर दुसरी एखादी घटना तयार होते. तेव्हा दोन घटनांना लिंक करून खंडणीच्या घटनेला आपण मोठी घटना म्हणू शकतो किंवा मास्टरमाईंड म्हणू शकतो. अशी प्रोव्हिजन आपल्या कायद्यात पहिल्यांदा झाली. मला वाटतं की हा कायदा बनल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदा बीडमधील खंडणीची घडली आहे. या खंडणीच्या प्रकरणाला या नव्या कायद्यात घेण्यात आलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“तसेच या तपासात सीआयडीवर कोणताही दबाव नाही. धनंजय मुंडे जर यामध्ये सामील असते किंवा एक जरी पुरावा सीआयडीला तसा मिळाला असता तर सीआयडीने कारवाई केली असती. पण माझ्या माहितीनुसार अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता आमच्या पक्षाचेही काही नेते आरोप करतात, विरोधी पक्षाचेही काही नेते आरोप करतात. पण फक्त आरोप करून काही होत नाही. कायदा हा भावनांच्या आधारे चालत नाही. लोक भावनावर आधारित बोलतात. आता बीडच्या प्रकरणात आम्ही एवढे पुरावे मिळवले आहेत की त्या आरोपींमधील कोणीही सुटणार नाही. तसेच कठोरातील कठोर शिक्षा त्यांना होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.