Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. यातच सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच मंत्र्यांच्या अशा पद्धतीच्या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावला पाहिजे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
या सर्व विषयांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणासह मंत्रिमंडळातील तीन लाडके मंत्री कोण? असे अनेक प्रश्न विचारले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या खास शौलीत उत्तरे दिली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मंत्रिमंडळातील एक सदस्य बोलले की मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री आहे, मग मंत्रिमंडळातील दोन्ही उपमुख्यमंत्री सोडून तीन लाडक्या मंत्र्यांची नावं सांगा असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मी आता लाडका मंत्री योजना घोषित केलेली आहे. त्या योजनेच्या निकषात जे-जे बसतील त्यांना लाडका मंत्री म्हणून घोषित करेन”, असं त्यांनी म्हटलं.
अधिकारी कोणाचंच ऐकत नाहीत? हे खरं आहे का?
दरम्यान, अधिकारी तुमचं सोडून कोणाचंच ऐकत नाहीत? हे खरं आहे का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मी २०१४ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत माझ्या लक्षात आलं की नोकरशाही ही घोड्यासारखी आहे. याच्यावर पक्की मान ठोकून बसलं तर घोडा धावणार, अन्यथा तो तुम्हाला आदळणार, त्यामुळे मी हे शिकवून घेतलं की पक्की मान ठोकून बसायचं. त्यामुळे मला नोकरशाहीकडून तेव्हाही आणि आताही कोणतीही अडचण नाही. महाराष्ट्राची नोकरशाही चांगली आहे, पण मला एक कमतरता त्यामध्ये दिसते. तुम्ही चांगले आहातच, पण तुम्हीच चांगले आहात असं समजू नका. लोक तुमच्या पेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले?
नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.