सोलापूर : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीमुळे देशातील लोकशाही  मजबूत असल्याचे लक्षण आहे. हेच आता भारताने जगाला दाखवून दिले आहे. पाकिस्तानने भारताच्या विरोधात चालविलेला अपप्रचार उघड्यावर पडला आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आलेले फडवणीस अक्कलकोटमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभांच्या निवडणूक निकालावर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि निवडणूक आयोगाने राबविलेल्या निवडणूक  प्रक्रियेचा भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्याचा आपणास अभिमान वाटतो, असा उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis : “भोंग्याला आता कसं वाटतं आहे? मला..”, हरियाणा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला

ते म्हणाले, जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी जगातील अनेक देशांचे प्रतिनिधी, निरीक्षक आले होते. दुसरीकडे भारताने लष्कराच्या बळावर जम्मू काश्मीर ताब्यात ठेवले आहे, अपप्रचार पाकिस्तान आणि विभक्तवादी शक्तींनी चालवला होता. परंतु प्रत्यक्षात जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया कशा पद्धतीने नांदते आहे, हे आता दिसून आले आहे. निवडणूक, मतदान प्रक्रिया  शांततेने पार पडली. ज्या लोकांना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहतील, असे वाटत होते, ते तर सोडाच, पण आता तेथे आता लोकनियुक्त सरकार सत्तेवर येत आहे. या निवडणुकीत भाजपने केलेली कामगिरी चांगली आहे, असा निर्वाळा फडवणीस यांनी दिला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने तिसऱ्यांदा संपादन केलेला जनतेचा विश्वास अतिशय मोलाचा असून यातून विरोधकांचे स्वप्नरंजन झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.