Devendra Fadnavis Maharashtra Assembly Session 2025 : विधीमंडळाच्या अर्थसंकल्यीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधकांमध्ये बराच वेळ शाब्दिक संघर्ष चालू होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या मुद्यांवर उत्तरं देताना फडणवीस यांनी शायरीतून उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.”

फडणवीस म्हणाले, “मला जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलं. आज ते सभागृहात नाहीत. मात्र, माझं भाषण इतर व्यासपीठांवर ऐकतील. दंगल करणाऱ्यांचा, बलात्कार करणआऱ्यांचा इतका पुळका का? त्यांच्यासाठी का छाती बडवता? ठीक आहे, अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला. त्याचा एन्काउंटर झाला नसता तर बरं झालं असतं. त्याला कायद्याच्या मार्गाने फाशी व्हायला हवी होती. मात्र, त्याच्यासाठी छाती बडवली जाते. जसा काय तो एखादा स्वातंत्र्यसैनिक होता. रोज-रोज तेच चालू होतं.”

देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

मुख्यमंत्री म्हणाले, “दंगे करणारे, बलात्कारी व इतर मोठ्या गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. मात्र, त्यांच्याबद्दल कोणाच्याही मनात संवेदना तयार होत असतील तर ते योग्य नाही. त्यासाठी काही लोकांची मनं तपासून पाहावी लागतील. नानाभाऊ (काँग्रेस आमदार नाना पटोले) हे सगळं ऐकलायवर मला एकच वाटतं की आप इतना भी गरज गरज कर न बरसो की मैं आंधी, तुफान या सैलाब बन जाऊं…”

देवेंद्र फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले,

आप इतना भी गरज गरज कर न बरसो
आप इतना भी गरज गरज कर न बरसो की मैं आंधी, तुफान या सैलाब बन जाऊं
खैर,
खैर, मुझमे तो अभी साख बाकी हैं
आप टटोलना खुदको, अपनी फितरत को
सच बोलूं? आप में वह पहले वाली बात कहां बाकी हैं

फडणवीस विरोधकांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही तिघे (मी, एकनाथ शिंदे अजित पवार) एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत.