अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिली होती. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना ( ठाकरे गट ) युती आहे. त्यामुळे याप्रकरणावरून भाजपा आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात येत आहे. यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “औरंगाजेबाच्या मुद्द्यावरून दंगल करणारे हे ‘औरदंगाबाद’ आहेत,” असा आरोप अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आमची युती होती, तेव्हा अडवाणीही जिनाच्या कबरीवर नतमस्तक झाले होते. नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक खाण्यासाठी आपले पंतप्रधान गेले होते. लोकांना इतिहासात अडकवून ठेवण्यात आणि निवडणुकीत चेहरा चालत नसेल, तर जय बजरंगबली करायचे, कधी दाऊद, कधी औरंगाजेबाचा चेहरा वापरायचा.”
“औरंगाजेबाच्या मुद्द्यावरून दंगल घडवणारे हे ‘औरदंगाबाद’ आहेत. यांना दंगली पेटवत कारभार करायचा आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : “एकनाथ शिंदेंकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे…”, संजय राऊतांचं मोठं विधान
“बाळासाहेब ( प्रकाश ) आंबेडकरांनी औरंगाजेबाच्या कबरीवरून जाऊन फुलं वाहिली. त्या कबरीचं आणि औरंगाजेबाचं महिमामंडण करण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरेंबरोबर युतीत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं समर्थन आहे का? त्यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं समर्थन करत आहे, असं वाटतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर गेल्याने विचारही गहाण ठेवल्याचं वाटतं,” अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.