Dharmaveer 2 Released in Theaters: शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटानं राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फोडल्यानंतर आता ‘धर्मवीर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरुवारी संध्याकाळी चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियर सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पण त्यांनी आपल्या प्रतिक्रियेच्या शेवटी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खुद्द फडणवीसांनीच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या प्रतिक्रियेचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी चित्रपटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं लोकांना फारसं माहिती नसलेलं आयुष्यही समोर आल्याचं म्हटलं. “आज धर्मवीर २ च स्क्रीनिंग सुरू झालं आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रेरक जीवनावर आधारित धर्मवीर १ हा चित्रपट आपण पाहिला. त्यांच्याच प्रेरणेनं जे नेतृत्व उभं राहिलं, ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सुरुवातीचं अनेक लोकांना माहिती नसलेलं आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात एक राजकीय भूकंप झाला. त्यानंतर साहजिकच सगळ्यांची मागणी होती की ‘धर्मवीर २’ आला पाहिजे. ‘धर्मवीर १’ लोकांनी डोक्यावर घेतला. लोकांना तो अतिशय आवडला. एखाद्या चित्रपटातले चरित्रनायक काल्पनिक असू शकतात. पण आपण ज्यांना पाहिलंय, ज्यांच्याबद्दल वाचलंय, ऐकलंय असे चरित्रनायक जेव्हा पडद्यावर पाहायला मिळतात, तेव्हा लोक आपापल्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले जातात”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मलाही उत्कंठा, काही गोष्टी पाहिल्या आहेत, काही…”

“हा चित्रपट फक्त मनोरंजनासाठी नसून एक संघर्षगाथा सामान्य माणसापर्यंत जात आहे. यातूनच लोकांना प्रेरणा मिळेल असा मला विश्वास आहे. मलाही चित्रपटाबाबत उत्कंठा आहे. काही गोष्टी मी पाहिल्या आहेत, काही पाहायच्या आहेत”, असं ते म्हणाले.

दरम्यान, यावळी माध्यम प्रतिनिधींनी फडणवीसांना चित्रपटाच्या पुढील भागात आपली काही प्रमुख भूमिका असेल का? किंवा असा कुठला चित्रपट आपण तयार करण्याचा विचार करत आहात का? अशी विचारणा केली असता त्यावर फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. “जेव्हा धर्मवीर ३ येईल तेव्हा त्याची पटकथा मी लिहीन”, असं फडणवीस म्हणाले. मात्र, आता चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये दिवंगत आनंद दिघे यांचं आयुष्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर ‘धर्मवीर ३’ मध्ये कुठल्या गोष्टी दाखवल्या जाणार आणि त्यासंदर्भात फडणवीसांना कुणाच्या आयुष्यावर बेतलेली पटकथा लिहायची असावी? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

पाहा फडणवीसांच्या प्रतिक्रियेचा पूर्ण Video:

संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “त्यांनी धर्मवीरांची व्याप्ती काय होती ते आम्हाला माहिती आहे. ती फडणवीसांनाही माहिती नाही आणि एकनाथ शिंदेंनाही माहिती नाही. आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यांना आता भाजपाच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंच्या वर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण बाळासाहेब ठाकरेंचं महाराष्ट्रभर पसरलेले लोक एकनाथ शिंदेंना मानत नाहीत. त्यामुळे अशा चित्रपटांच्या माध्यमाधून एक नवीन प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकनाथ शिंदेंपेक्षा राजन विचारेंसारखे अनेक लोक आनंद दिघेंच्या फार जवळ होते. त्यामुळे धर्मवीरांवर काल्पनिक कथा रचून पडद्यावर चित्रपट आणण्यापेक्षा धर्मवीरांप्रमाणे तुम्ही शिवसेनेप्रती निष्ठा बाळगली असती, तर तुम्हाला असे चित्रपट काढून स्वत:चा डंका पिटायची वेळ आली नसती”, असं संजय राऊत म्हणाले.

Dharmaveer 2: शिवसेनेतील बंडाचे कारण केवळ हिंदुत्व, ‘धर्मवीर’ मध्ये हेच अधोरेखित

“देवेंद्र फडणवीसांना काय धर्मवीर माहिती? त्यांनी औरंगजेबावर चित्रपट काढला पाहिजे. नवीन औरंगजेब आणि अफझलखान दिल्ली आणि गुजरातमधून महाराष्ट्र लुटायला येत आहेत. त्यांच्यावर फडणवीसांनी चित्रपट काढला, तर त्यांची चर्चा होईल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.