Devendra Fadnavis on His Resignation: लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महायुतीची व भारतीय जनता पक्षाची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपाच्या जागा राज्यात २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्यामुळे शिंदे गट व अजित पवार गटाशी युती केल्याचा भाजपाला फायदा झाला की तोटा? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी जाहीर केला असून जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, एकीकडे या सगळ्या घडामोडी चालू असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक इशाऱ्यांना सुरुवात केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

गुरुवारी देवेंद्र फडणवीस इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर सविस्तर मुलाखत दिली. एकीकडे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं असताना दुसरीकडे विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा आक्रमक होत असल्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांना भारतीय जनता पक्ष व खुद्द देवेंद्र फडणवीस कसे सामोरे जाणार? अशी चर्चा असताना त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे पाटलांवर खोचक टीका

“मराठा आरक्षणाची ही समस्या तर आहे. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं. आजही मराठा समाजाला १० टक्के आरक्षण आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मागण्या केल्या. आता सध्याची त्यांची मागणी अंतिम आहे की नाही हे मला माहिती नाही, पण ते ज्या मागणीवर अडून बसले आहेत ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण दिलं जावं”, अशी खोचक टिप्पणी यावेळी फडणवीसांनी केली.

“तेव्हा आम्ही सर्वपक्षीय बैठक घेतली होती. शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे लोकही आले होते. सगळ्यांनी मिळून एका प्रस्तावावर सह्या केल्या आहेत. त्यात म्हटलंय की मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं पण ते इतर कुणाच्या प्रवर्गातून दिलं जाऊ नये. आता मनोज जरांगे पाटील म्हणतायत त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवंय”, असं फडणवीस म्हणाले.

“…त्या दिवशी मी राजीनामा देईन”

“मनोज जरांगे पाटील रोज माझ्यावर बोलतात. देवेंद्र फडणवीस आरक्षण देऊ इच्छित नाहीत, त्यांनी ते अडकवून ठेवलंय असं ते बोलतात. आधी तर मी त्यांना सांगेन की मुखमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे निर्णय एकत्र मिळून घेतात. माझे मुख्यमंत्री ज्या दिवशी सांगतील की त्यांना मराठा आरक्षणाबाबत कुठला निर्णय घ्यायचा आहे आणि मी तो अडकवून ठेवला आहे त्या दिवशी मी राजीनामाही देईन आणि राजकारणातून संन्यासही घेईन”, असं विधान यावेळी उत्तरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Dharmaveer 2 Release: “धर्मवीर ३’ ची पटकथा मी लिहिणार”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

फडणवीसांचं जरांगे पाटलांना आव्हान!

“मनोज जरांगे पाटील माझ्यावरच का आरोप करतात हे सगळ्यांना माहिती आहे. मी जरांगे पाटलांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही भाजपाविरोधात आहात, आमच्याविरोधात आहात, आमच्यामुळे आरक्षणाचं काम होत नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर मग तुम्ही ज्यांना समर्थन देता, लोकसभेच्या वेळी ज्यांना तुम्ही पाठिंबा दिला, तुमच्या लोकांनी मविआच्या तिन्ही पक्षांचं काम केलं, त्या तिघांकडून तुम्ही लिहून घ्या की ते सत्तेत आले तर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं जाईल. मग त्यांना मदत करा तुम्ही”, असं आव्हानही फडणवीसांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं.

“हे सगळं राजकीय चालू आहे. अनेक लोक इतरांच्या खांद्यांवरून बंदुका चालवत आहेत. पण हळूहळू लोकांसमोर गोष्टी स्पष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीत जेवढा याचा परिणाम होईल असं लोकांना वाटतंय, तेवढा तो होणार नाही”, असा विश्वास फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.