शिवसेनेतल्या आमदारफुटीवरून भारतीय जनता पक्षावर आरोप होतात. या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. टीव्ही ९ मराठीवरील मुलाखतीत फडणवीस यांना विचारण्यात आले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगणं, पक्षचिन्हावर दावा सांगणं यामागे भाजपा आहे. भाजपाला ठाकरेंना संपवायचं असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. हे कितपत खरं आहे. यावर फडणवीस म्हणाले की, जगात कोणीच कोणाला संपवू शकत नाही. आम्ही काय मुर्खांच्या नंदनवनात वावरत नाही. याला संपवून टाकू, त्याला संपवून टाकू असा विचार करायला हे काही मुर्खांचं नंदनवन नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच त्यांच्या पायावर कुर्ङाड मारून घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचं खच्चीकरण झालं असेल तर त्याला केवळ ते स्वतःच जबाबदार आहेत. तसेच पक्ष हा शिवसैनिकांचा आहे, शिवसैनिकांनी बनवला आहे. त्यामुळे जिकडे शिवसैनिक, शिवसेनेचे आमदार आणि खासदार तिकडेच पक्ष जाणार. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की, मुख्यमंत्र्यांच्या नाकाखालून त्यांचे ७५ टक्के लोक निघून गेले. ते सत्तेत असूनही असं घडलं. ते विरोधी पक्षात असते तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःचं आत्मपरिक्षण करणार आहेत का? असा सवाल उपस्थित होतो.
हे ही वाचा >> “म्हणून मला तुरुंगात टाकू शकले नाहीत”; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, “मी ५ वर्ष…”
“शिवसेनेला आत्मपरिक्षण करायचं नाही”
उपमुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना केवळ भाजपाला दोष देत आहे. त्यांना काही आत्परिक्षण करायचं नाही, सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त भाजपाला शिव्या द्यायच्या असं सुरू आहे. परंतु जे काही झालं ते कायदेशीर होतं. हे प्रकरण न्यायालयात आहे, निवडणूक आयोगाकडे आहे. यात जर एकनाथ शिंदे यांची बाजू योग्य असेस तर पक्ष त्यांना मिळेल, उद्धव ठाकरे यांची बाजू योग्य असेल तर पक्ष त्यांना मिळेल, आपण सध्या तरी वाट पाहुया.