राजकारण हा असा धंदा आहे ज्यात सकाळी उठल्यापासून शिव्या खायची तयारी असेल तरच तुम्ही जनतेला न्याय देऊ शकता. या शिव्या नसतात, या सामान्य माणसाच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात. कारण त्या सामान्य माणसाला हे माहीत असतं की हेच लोक आहेत जे आमच्या अपेक्षा पूर्ण करु शकतात असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांची उपस्थिती होती. त्यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मध्यंतरीच्या सरकारच्या काळात (महाविकास आघाडी) सहा महिने लोक आंदोलन करत होते. महिला, मुलं, शिक्षक बसले होते. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारचा एक मंत्रीही त्यांना भेटायला गेला नाही. मात्र महायुतीचं सरकार संवेदनशील आहे. चादर पाहून पाय पसरावे लागतात. तसं करताना शेवटच्या घटकाचा विचार केला पाहिजे, तो विचार आम्ही करतो.” असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

लाडक्या बहिणींचा उल्लेख करत काय म्हणाले फडणवीस?

लाडकी बहीण योजना आम्ही आणली त्यानंतर विरोधक म्हणत आहेत की ही योजना बंद करणार, मी सांगू इच्छितो असा खेळ आमच्या लाडक्या बहिणींशी करु नका. पुढच्या पाच निवडणुकांमध्ये आमच्या बहिणी तुम्हाला निवडून देणार नाहीत. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजुर ए खुदा होता है. यांनी कितीही प्रयत्न केला, विरोधकांनी कितीही याचिका दाखल केल्या तरीही ही योजना आणि महिलांसाठीची योजना बंद करण्याची मागणी केली आहे. तुम्हाला सत्ता मिळाल्यावर आमच्यापेक्षा चांगलं द्या, पण तुम्ही फुटकी कवडी देत नाही आणि आमची योजना बंद करण्यासाठी खटपट करता. पण आम्ही आहोत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी स्पष्ट केलं.

विरोधक प्रचंड खोटारडे आहेत

विरोधक इतके खोटारडे लोक आहेत, यांनी दलित समाजात सांगितलं की दलित निधीचे पैसे लाडकी बहीण योजनेला वळवले. माहितीच्या अधिकारात एकाने माहिती घेतली तर कळलं पैसे इकडे वळवणं सोडा, दलित महिलांच्या निधीमध्ये मागच्या वर्षीपेक्षा जास्त पैसे आले आहेत. त्यानंतर यांची तोंडं बंद झाली.

हे पण वाचा- बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण : आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

१०० राहुल गांधी आले तरीही…

कधीकधी पोटातलं ओठांत येतं, राहुल गांधींना हे माहीत नाही की ते परदेशात बोलले तरीही मीडिया सगळं कव्हर करतो. स्मशानातही मीडिया पोहचतो. त्यांना वाटलं परदेशात बोललो तर कुणाला कळणार नाही. राहुल गांधींनी परदेशात जोरदार मुलाखत दिली. कसं आम्ही आरक्षण बंद करणार आहोत आणि त्याचा व्हिडीओ समोर आलाय. मला कुणावर टीका करायची नाही. पण पंडित नेहरुंनीही असं म्हटलं होतं की आरक्षण कमी डोक्याच्या लोकांना द्यावं लागतं. राजीव गांधी म्हणाले होते आरक्षणामुळे देश खिळखिळा होतो. आता तीच रि राहुल गांधी ओढत आहेत आणि सांगत आहेत आरक्षण रद्द केलं पाहिजे. मात्र आपण काळजी करु नका, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं आहे त्याची ताकद इतकी आहे की १०० राहुल गांधी आले तरीही एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण ते रद्द करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. मला इतकंच सांगायचं आहे की या लोकांच्या पोटात काय, ओठात काय हे तुम्ही ओळखा.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.