Devendra Fadnavis : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघात दौरे करत सभा आणि मेळावे घेत आहेत. विविध मतदारसंघात मेळावे घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-पत्यारोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक डायलॉग मारत विरोधकांना इशारा दिला आहे. “देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळाच जोरदार चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“मी समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आलो होतो. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की, १०६ आमदार निवडून द्या. सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. मग सरकारचा करेक्ट कार्यक्रम केला ना? तुम्ही मला १०६ वा आमदार दिला आणि आपलं सरकार, महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आणलं. तुम्हाला दुसरं आश्वासन दिलं होतं की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून या मतदारसंघात पाणी आणून दाखवेन. एक लक्षात ठेवा देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच केलं सूचक विधान!

“तुम्ही समाधान आवताडे यांना एक मत दिलं आणि त्यांनी देखील तुमचं समाधान करून दाखवलं. युतीच्या सरकारमध्ये आपण अनेक योजना सुरु केल्या. मात्र, मध्यंतरी १५ वर्ष या सर्व योजना बंद होत्या. लोक म्हणायचे पाणी पोहचू शकत नाही. मात्र, आपलं सरकार आल्यानंतर केंद्र सरकारची मदत घेतली आणि सोलापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन. आज साताऱ्यातील काही तालुक्यांना दुष्काळी तालुके म्हटलं जायचं. पण आज ते तालुके दुष्काळी राहिले नाहीत. हे काम साताऱ्यात करून दाखवलं आहे. तेच काम सांगलीत देखील करून दाखवलं आहे. मागच्या काही काळाच सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली”, असं देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं.