धाराशिव – राज्यातील सर्वात पुरातन मंदिर, अशी ख्याती असलेल्या चौथ्या शतकातील त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः उकलून पुन्हा एकदा दीड हजार वर्षांपूर्वी होता, तसा साकारला जात आहे. त्यासाठी दीड हजार वर्षांपूर्वी ज्या विटा वापरल्या जात, अगदी तशाच विटा तयार केल्या जात आहेत. याच सभामंडपात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्तीनाथ आणि संत गोरोबा कुंभार यांच्या उपस्थितील पहिले संत संमेलन झाले होते.

राज्य शासनाच्या पुरातत्व विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने त्रिविक्रम मंदिराच्या जतन व संवर्धन कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे तेरच्या विकासातही मोठी भर पडणार आहे. धाराशिव तालुक्यातील तेर येथे असलेले त्रिविक्रम मंदिर हे आजघडीचे राज्यातील सर्वात पुरातन मंदिर आहे. या मंदिराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सन २०२३ सालात दोन कोटी ९० लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानुसार प्रत्यक्षात पुरातन त्रिविक्रम मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे या मंदिराच्या पुरातन सौंदर्यात या कामामुळे भर पडणार आहे. अनेक इतिहास संशोधकांनाही हे काम सध्या खुनावत आहे.

हेही वाचा – “आमचे पाय जमिनीवरच”, शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला

हेही वाचा – “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?” अमेरिकेत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर; म्हणाले, “मॅटर्निटी होम…”

त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर सातव्या शतकातील लाकडी मंडप आहे. याच लाकडी मंडपात संतमेळा भरला होता. मराठी भाषेतील पहिले संमेलन असाही त्याचा उल्लेख केला जातो. स्वतः नामदेव महाराजांनी या मंदिरात किर्तन केले होते. गर्भगृहाला भेगा पडल्याने या लाकडी मंडपाला पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे लाकडी मंडप कोसळण्याची भीती ग्रामस्थांसह भाविक व संशोधकांनी व्यक्त केली होती. त्याअनुषंगाने लाकडी सभामंडप बांधणे, गर्भगृह, गरूड मंदिर, मेंडेश्वर मंदिराची दुरुस्ती, प्रकाश योजना अशा विविध कामांसाठी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने २ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर केला. केवळ धाराशिव नव्हे, तर महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाची ऐतिहासिक ओळख असलेल्या दीड हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिराला भेट द्यावयाची असेल तर तेरला यावे लागणार आहे.