धाराशिव : ओबीसी प्रवर्गातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाजबांधवांनी समर्थन दिले. दरम्यान या बंदला जिल्ह्यातील धाराशिवसह, परंडा, भूम, वाशी, कळंब, उमरगा, लोहारा, तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील व्यापारी, शाळा, महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ शनिवार जिल्हा बंद ठेवून मागणीचे निवेदन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने महसूल प्रशासनामार्फत देण्यात आले.

हेही वाचा – Dharavi Masjid : “…म्हणून हिंदू-मुस्लीम दंगल घडविण्याचा सरकारचा शेवटचा प्रयत्न”, धारावी प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची टीका

हेही वाचा – कौटुंबिक वादातून सख्या भावानेच भावाला सुरीने भोसकले

मराठा समाजाला ओबीसी वर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून लढा सुरु केला आहे. सुरुवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. यानंतर मुंबईवर मोर्चा काढल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी – सगेसोयरेची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता. शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तत्कळ करावी, हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करा, अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, मागेल त्या गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आणि कुणबी एकच आहे हा अध्यादेश पारीत करण्यात यावा, अशा मागण्या आहेत. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देऊन मराठा समाजाच्या वतीने शनिवारी जिल्ह्याभरात पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला.