Raosaheb Danave on Eknath Shinde CM : महायुतीला भरभक्कम बहुमत मिळूनही दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होऊ शकलेला नाही. शिवसेनेतील नेत्यांनी शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी जोरकसपणे लावून धरली आहे. तर दुसरीकडे भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. दरम्यान, भाजपाने मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्ट संदेश दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नूर बदलला आहे. निकालानंतर आक्रमक झालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आता मवाळ झाले आहेत. यातच, एकनाथ शिंदेंना अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, अशीही चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये तत्कालीन भाजपा-शिवसेने युतीमध्ये शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा करण्यात येत होता. परंतु, याबाबत चर्चाच झाली नसल्याची भूमिका भाजपाने घेतली होती. त्यामुळे विश्वासघात केला असं सांगत उद्धव ठाकरेंनी युती तोडली होती. दिलेला शब्द मोडल्याचं सांगत उद्धव ठाकरे युतीतून बाहेर झाले होते. आताही तशीच चर्चा सुरू आहे. जागा वाटपाच्या वेळी अडीच-अडीच वर्षांचे मुख्यमंत्री पदाचे आश्वासन एकनाथ शिंदे यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, या चर्चेवर रावसाहेब दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा >> मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…”

रावसाहेब दानवे म्हणाले, “तुमच्या नेतृत्त्वात निवडणुका लढतोय असं एकनाथ शिंदेंना सांगितलं होतं, यात काही शंका नाही. पण मुख्यमंत्री पदाबाबत कोणीच कोणाला शब्द दिला नव्हता. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर एकमत आताही आहे.”

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

“विधानसभेच्या निवडणुकात भाजपा, शिवेसना, आणि एनसीपी आम्ही एकत्र लढलो. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढलो. आम्ही एकत्र निवडणुका लढतोय, असं आम्ही तेव्हा सांगितलं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबाबत आम्ही निकालानंतर एकत्र बसून निर्णय घेऊ, असं ठरलं होतं. सत्ता येईल तेव्हा आम्ही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करू, असं बैठकीत ठरलं होतं”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.

शिवसेनेची भूमिका फडणवीसांना सांगितली

“आमच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस  अजित पवार) तसेच इतर घटक पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि मुख्यमंत्रिपदावर तोडगा काढतील. ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढलो होतो. या निवडणुकीत आम्हाला देदीप्यमान असं यश मिळालं आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला हे यश मिळालं, ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली, त्यांच्याच नेतृत्वाखालचं सरकार यावं अशी आम्हा सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची इच्छा आहे. तशीच भावना आमच्या सर्व आमदारांच्या मनात आहे. शिवसेनेच्या बैठकीत यावर आम्ही चर्चा केली. त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही काही प्रमुख मंडळींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आमच्या बैठकीत झालेली चर्चा आणि शिवसेनेची भूमिका फडणवीसांना सांगितली आहे”, असं शंभूराज देसाई म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did mahayuti give promise about the post of chief minister for two and a half years to eknath shinde says raosaheb danave sgk