मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १३ जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. १३ जुलैपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश न निघाल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. दरम्यान, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याविरोधात षड्डू ठोकला असून जरांगे आणि भुजबळ यांच्या सातत्याने शाब्दिक वाद होत असतात. आता यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.

ओबीसी आरक्षण संरक्षणार्थ उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेताना छगन भुजबळ यांनी शेरोशायरी केली होती. यावरून मनोज जरांगे म्हणाले, “येवलेवाल्यापेक्षा बेक्कार शेरोशायरी आपल्याला येते. आपल्या मराठ्यांचे चार-पाच नेते बेक्कार आहेत. ते तरी कागद बघून वाचतात. आपल्या मराठ्यांचे नेते तर असे आहेत की त्यांना शायरीशिवाय दुसरं काही येतंच नाही. ते टिकूच शकत नाहीत यांच्यासमोर.”

दरम्यान, मनोज जरांगेंच्या अंगाद ताकद आहे का? अशी टीका छगन भुजबळांनी केली होती. त्यावर, जरांगे म्हणाले, “ते म्हणतात की अंगात ताकद नाही. तुला काय लग्न करायचं आहे का माझ्यासंग. तुला करायचं काय. तू मोजतोच का. डॉक्टर मोजतात मला. मी कधी बोललोय का मला उठून बाथरुमला ने”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

हेही वाचा >> मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका, “बेट्या तुझा टांगा पलटवतोच, तू आमच्यात काड्या…”

मराठा समाजाला केलं आवाहन

“कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे, असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या, आम्ही १५० वर्षांपासून आरक्षणात आहोत, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही आहोत. आता आम्हाला माहिती झालं आहे, त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटलं पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण.” असंही मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे आणखी काय म्हणाले?

मनोज जरांगेंनी राज्य सरकारला सगे सोयऱ्यांसह मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. मनोज जरांगे म्हणाले, “१३ जुलैनंतर सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं” हे इतके दिवस बोललो नव्हतो. पण आता बोलणं आवश्यक आहे असंही मनोज जरांगेंनी म्हटलंय. उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले, त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केलं. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचंही जरांगेंनी पुन्हा एकदा म्हटलं आहे.