वाई : सातारा पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक पुरस्कार या वर्षी उद्योजक व सातारा जिल्ह्यातील २८ गावांमध्ये लोकोपयोगी विकासकामे करणारे ‘सातारकर’ भारत फोर्जचे पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यात वितरित करण्यात आला. सातारा पालिकेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक पुरस्कार देण्यात येतो.यापूर्वी नाम फाउंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना गौरविण्यात आले आहे. या वर्षीचा पुरस्कार मूळ सातारकर उद्योजक व जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विकासकामे राबवणाऱ्या पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना जाहीर करण्यात आला होता. करोना नियमामुळे त्यांच्याच पुण्यातील कार्यालयात या पुरस्काराचे सोमवारी वितरण करण्यात आले. रुपये एक लाख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी, हरीष पाटणे, अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या वेळी बाबासाहेब कल्याणी म्हणाले, मी माझे सामाजिक कार्य करत असतो. सातारा जिल्ह्यातील कोळे या गावचा मी रहिवासी आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागाचे दु:ख मला माहीत आहे. ग्रामीण समस्यांची मला जाणीव आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी माझी तळमळ आहे. सातारा जिल्ह्यातील २८ गावांमध्ये भारत फोर्जच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील शंभर गावांमध्येही कामे सुरू आहेत. सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांना त्याचा फायदा होत आहे. जलसंधारण, पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, वीज या विषयांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून भारत फोर्जने गावागावात विकासकामे राबवली आहेत. ग्रामीण जनतेच्या आम्ही उपयोगी पडू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो.
बाबासाहेब कल्याणी म्हणाले, खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे व माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. या संबंधातूनच माझ्या मालकीची जागा फक्त एक रुपया या नाममात्र भाडेतत्त्वावर मी सातारा नगरपालिकेला दिली. सातारा नगरपालिकेचे स्वच्छतेच्या क्षेत्रात, पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. हे नाव त्यांनी असेच टिकवावे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासारख्या महापुरुषाच्या नावाने मला पुरस्कार दिला गेला त्याबद्दल मी खा. उदयनराजे भोसले व सातारा नगरपालिकेला धन्यवाद देतो. रुपये एक लाख रक्कम साताऱ्यातील गरजू व्यक्ती अथवा संस्थेसाठी ही रक्कम मदत करावी, असे सांगून ती परत केली. या वेळी पुरस्काराबद्दल बाबासाहेब कल्याणी यांनी सातारकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी केले.