हर्षद कशाळकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्याला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा बसला आहे. वर्षभरात ८ हजार कोटींचा गांजा, २१९ किलो चरस आणि ३१४ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले असून २३ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातून परदेशातही अंमली पदार्थांची तस्करी सुरू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या दोन महिन्यात रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर २१९ किलो चरसची पाकीटे वाहून आली. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनाऱ्यावर ही पाकिटे सापडली. १ किलो १०० ग्रॅमवजनाची १८५ पाकीटांचा यात समावेश होता. ज्याची किंमत ८ कोटी २५ लाख ११ हजार रुपयांच्या सपास आहे. या प्रकरणी अलिबाग, रेवदंडा, श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गन्हेही दाखल झाले. पोलीस यंत्रणेसह, केंद्रीय तपास यंत्रणांनी या चरस प्रकरणांचा तपास सुरू केला. पण तरिही ही पाकीटे कुठून आली याचा शोध अजूनही लागू शकलेला नाही.

हेही वाचा… “…म्हणून देशात अराजकता माजवायची होती”, आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांची धक्कादायक माहिती; विदेशी संबंधही तपासणार

आता खोपोली येथील ढेकू येथे एका इलेक्ट्रीक पोल बनविण्याच्या कारखान्यात बेकायदेशीर पणे केमिकल कंपनी सुरू असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. यात मेफेड्रॉन अर्थात एम डी हा प्रतिबंधीत अंमलीपदार्थ तयार केला जात असल्याचे समोर आले. पोलीसांनी सुरवातीला धाड टाकून ८५ किलो वजनाचे १०७ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. खोपोली पोलीसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान एका होनाड येथील गोडाऊन मध्ये १७७ किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. ज्याची बाजारातील किमंत २१८ कोटींच्या आसपास आहे. याच तपासा दरम्यान आरोपींनी मेफेड्रॉन जेएनपीटी मार्गे परदेशातही पाठवल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याला अंमली पदार्थ तस्करीचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात १ जानेवारी ते १५ डिसेंबर पर्यंत रायगड पोलीस दलाच्या हद्दीत अंमली पदार्थ तस्करी, विक्री आणि सेवनाचे एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले. यात ८ हजार ४१४ किलो गांजा, २२९ किलो चरस आणि ३१४ किलो मॅफेड्रॉन जप्त केले आहे. तर या प्रकरणांमध्ये आजवर एकूण २३ जणांनावर कारवाई करण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा अंदाज येऊ शकतो.

हेही वाचा… नागपूर: भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; सहा जणांचा जागीच मृत्यू

सागरी सुरक्षेतील त्रृटी पुन्हा उजागर

१९९२ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील स्फोटके उतरवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेखाडी आणि दिघी या किनाऱ्यांचा वापर केला गेला होता. आता मेफेड्रोन परदेशात पाठविण्यासाठी तस्करांनी समुद्री मार्गाचा अवलंब केल्याची बाब समोर आली. दोन महिन्यापुर्वी नौसेना, तटरक्षक दल, पोलीस आणि कस्टम्स यांचा डोळा चूकवून चरसची पाकीटे किनाऱ्यावर लागली. ही पाकीटे समुद्र किनाऱ्यावर कशी आली याचा शोध लागलेला नाही. किनाऱ्यावर पाहून आलेल्या चरसची सध्या विक्री आणि सेवन सुरू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि पुणे परिसरात हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये मेफेड्रॉनला मागणी असते, मेफेड्रोन वितरण करणे सोपे जावे यासाठी मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीची आरोपींनी निवड केली होती. आणि यासाठीच खोपोली परीसरात मेफेड्रॉन निर्मितीचा कारखाना उभारला होता. नव वर्ष स्वागत पार्ट्यामध्ये हे मेफेड्रॉन वितरणाचा आरोपींचा मानस होता अशी माहिती आता समोर येत आहे.

खोपोली मेफेड्रॉन प्रकरणाच्या सर्व बाजू तपासल्या जात आहेत. आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी मेफेड्रॉन परदेशातही पाठवल्याचे समोर आले आहे. त्याही दृष्टीने तपास सुरू आहे. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugs trafficking in raigad district eighteen cases registered in the year 2023 asj