दावोस दौऱ्यादरम्यान ३ लाख ५३ हजार कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. आमचा दावोस दौरा हा चांगला झाला. महाराष्ट्राच्या दृष्टीने हा महत्त्वाचा दौरा ठरला. आम्ही जे करार गेल्यावर्षीही केले त्यातलेही ८० टक्के पूर्ण झाले आहेत. आम्ही सह्या केलेले करार हे कागदावरच राहिलेले नाहीत. आता ३ लाख ५३ हजार कोटींचे MoU आम्ही केले आहेत. दोन लाख रोजगार निर्मिती यामधून होणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दावोस दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लोबल लीडर

केंद्रात आणि राज्यात समविचारी सरकार आहे. त्यामुळे उद्योजक अत्यंत विश्वासाने गुंतवणूक करतात. दावोस दौऱ्यातही त्याचाच प्रत्यय आला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तसंच जेम्स आणि ज्वेलरीमध्ये एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे. आमचा हा दौरा यशस्वी ठरला आहे. मनुष्यबळ, पायभूत सुविधा अशी सगळी व्यवस्था महाराष्ट्रात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार आहेत. आम्हाला दावोस दौऱ्या दरम्यान मोदींचाही करीश्मा पाहण्यास मिळाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्लोबल लीडर आहेत. दावोस दौऱ्यात आम्हाला त्याचा प्रत्यय आला. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जगभरात लौकिक झाला आहे. आम्हाला याचा अभिमान वाटतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या या दौऱ्यानंतर आता विरोधकांचे डोळे पांढरे होतील असाही टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमानतळावर जंगी स्वागत

तीन दिवसांचा दावोस दौरा आटोपून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार झाले असून १ लाख कोटींच्या गुंतवणुकीबाबत स्वारस्य दाखवण्यात आले आहे. तसेच या गुंतवणुकीच्या माध्यमातून दोन लाख रोजगार निर्मिती होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात गुंतवणूक करण्यासाठी आर्सेनिल मित्तल, निप्पोन, जिंदाल, अदाणी यांसारख्या नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. तसेच काही देशांतील मंत्र्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच गतवर्षी झालेल्या १ लाख ३७ हजार कोटीच्या सामंजस्य करारांपैकी ८० टक्के करार पूर्ण करण्यात आले होते. यावेळीही केलेले करार पूर्णत्वास नेण्याकडे सरकारचा कटाक्ष राहील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During davos visit 3 lakh 53 thousand crore mous signed two lakh jobs will be created said chief minister eknath shinde scj
Show comments