लोकसत्ता प्रतिनिधी

सातारा : थंड हवेचे ठिकाण किंवा गिरीस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी देश-विदेशात दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देत असतात. याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांचे ‘ब्रँन्डिग’ करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले.

राज्यमंत्री नाईक यांनी महाबळेश्वर दौरा करताना विविध ठिकाणांना भेट दिली. यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास भेट दिली. तसेच त्यांनी महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसराची आणि प्राचीन मंदिरांची पाहणी केली.

प्रथमतः त्यांनी पाच नद्यांचा संगम असणाऱ्या पंचगंगा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली. त्यानंतर जुने महाबळेश्वर मधील हेमाडपंथी वास्तुशैली असणाऱ्या व प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वैशिष्टपूर्ण मंदिराची पाहणी केली. कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या कृष्णामाई मंदिरात जाऊन देवीची पूजा केली व मंदिराची पाहणी केली.

यावेळी खादी आणि ग्रामीण उद्योगातून बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली. मधाचे संग्रहालय व विक्री केंद्र असणाऱ्या मधुसागर केंद्रास भेट दिली. तसेच मध उद्योगास चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या मध संचालनालयाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मध उत्पादन, मध विक्री व मध संकलन यासंबंधी माहिती जाणून घेतली. यावेळी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती तेजस्विनी खोचरे पाटील, विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.