Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा महाविकास आघाडीला लक्ष्य करत गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत फेक नॅरेटीव्ह पसरवून विजय मिळवणाऱ्या महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवू या विश्वासाने महायुतीच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे नियोजन केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
कोल्हापूरातील सरवडे येथे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की,”बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. एकनाथ शिंदेने या अडीच वर्षांच्या काळात हेच काम केले. मी लोकांमध्ये रमणारा आहे. गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामची पावती जनतेने दिली.”
जेलमध्ये टाकून…
“या विधानसभा निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकसभेमध्ये फेक नॅरेटीव्ह पसरवले. संविधान धोक्यात आहे, आरक्षण जाणार अशा खोट्या गोष्टी पसरवल्यामुळे आमचे संजय मंडलिक त्यात अडकले. त्यांना वाटले विधानसभा निवडणुकीतही असेच करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे वाटप केले आणि म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकू. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती,” असा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला.
कोल्हापूरी जोडा दाखवला…
पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीणसारख्या योजनांमध्ये विरोधकांनी खोडा घातल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी या योजनेमध्ये खोडा घातला होता, त्यांना तुम्ही चांगला कोल्हापूरी जोडा दाखवला. महायुतीचे सरकार आले. आजही आमची टीम तिच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा.”
लोकसभेत धुव्वा
दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत राज्यातील ४८ पैकी २९ जागा जिंकल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक १३ जागा काँग्रेस, ९ जागा शिवसेना आणि ७ जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी जिकल्या होत्या. तर महायुतीच्या वाट्याला अवघ्या १८ जागा आल्या होत्या. यामध्ये सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून विजयी झाले होते.
विधानसभेत महायुतीचे पुनरागमन
मात्र, त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार पुनरागम करत सत्ता कायम राखली होती. यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले.