राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट-भाजपा सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसानभरपाई तसेच औरंगबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर, अशा अनेक निर्णयांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात (नोव्हेंबर २०२२) शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला केला जाईल, असे शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> “सत्ता आणण्यात ते यशस्वी, मात्र रामराज्य…” एकनाथ खडसेंची एकनाथ शिंदेंवर टीका
“लवकरच आपण शिर्डीपर्यंत समृद्धी महामार्ग खुला करत आहोत. त्यानंतर शिर्डी ते नागपूर हा प्रवास सुखकर होणार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा मार्ग खुला केला जाईल,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
आज राज्यात बहुमत असलेले सरकार आहे. मागील तीन महिन्यात आम्ही ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. हे सर्व निर्णय राज्याच्या हिताचे आहेत. याच कारणामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ३९७ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे.तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे २४३ सरपंच झाले आहेत. हा आकडा आणखी वाढत आहे. या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले. विरोधी पक्ष टीका करत आहे. आम्ही टीकेला कामाने उत्तर देऊ, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> “दिवाळीनंतर राज्यपालांची भेट घेऊन…”, सरकार बडतर्फ करण्याबाबत नाना पटोलेंनी मांडली भूमिका!
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले आहे. निकषांचा विचार न करता आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. आता पंचनामे करण्यास सांगितले आहे, अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.