Eknath Shinde Speech : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे.या निमित्ताने आज शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मुंबईतील बीकेसी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला विजय हा बाळासाहेबांच्या विचारामुळे झाल्याचे म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकसभेपाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासीक विजय मिळवला कारण बाळासाहेबांच्या धगधगत्या प्रेरणेने आणि विचाराने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला म्हणून दणदणीत विजय आपल्याला मिळला आणि तो विजयउत्सव आज आपण साजरा करतोय”.

“अडीच वर्षांपूर्वी आपण केलेला उठाव आणि त्यानंतर विजय इतक देदीप्यमान आणि ऐतिहासिक आहे की संपूर्ण महाराष्ट्र, देश नाही तर जगभरात या विजयाची चर्चा आहे. पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहाणार नाहीत. हे यश बाळासाहेबांच्या विचारांचे आणि महायुतीच्या एकजुटीचं आहे. अडीच वर्ष केलेल्या कष्टाचं यश आहे. याबरोबरच राज्यातील माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके तरूण, लाडके शेतकरी आणि लाडक्या ज्येष्ठांचं यश आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

“सत्तेची जी दोन-अडीच वर्ष मिळाली त्यामध्ये पायाला भिंगरी लावून आपण काम केलं. एक मिनिटही वाया न घालवला नाही, म्हणून हा विजय आपल्याला मिळाला. विकासकामं तिप्पट, चौपट वेगाने आपण पूर्ण केली. एकीकडे विकास प्रकल्प दुसरीकडे लोकाभिमूख कल्याणकारी योजना या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं म्हणून राज्यातील जनतेने विश्वास दाखवला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

“बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं हे एक मोठं गिफ्ट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज बाळासाहेब असते तर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या पाठीवर शाबासकी दिली असती आणि पाठ थोपटली असती”, असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on balasaheb thackeray and assembly election win shivsena bkc sabha marathi news rak