Eknath Shinde Amravati Airport Inauguration : “आधीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो, अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आता फडणवीस मुख्यमंत्री, तर मी व अजित पवार उपमुख्यमंत्री आहोत. आमच्यात केवळ खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकवेळा केलं आहे. यावरून “एकनाथ शिंदेंच्या मनातून मुख्यमंत्रिपद काही जात नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे यांची अनेकदा फिरकी घेतल्याचं देखील आपण पाहिलं आहे. अशातच आज पुन्हा एकदा शिंदे यांनी खुर्च्यांची अदलाबदल झाल्याचं वक्तव्य केलं आहे.

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प व योजना बंद होत्या. मात्र आम्ही (महायुती) सत्तेत आलो आणि राज्याच्या विकासाचं, कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं. मी त्या विमानाचा पायलट (वैमानिक) होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे माझे को-पायलट (सह-वैमानिक) होते. आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट आहेत. मी व अजित पवार को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली आहे. मात्र, विकासाचं विमान तेच आहे, इंजिनही तेच आहे. आता ते अधिक गतीने धावताना दिसतंय.”

आधीच्या सरकारचे स्पीड ब्रेकर्स आम्ही हटवले : शिंदे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवरही यावेळी टीका केली. ते म्हणाले, “आमच्या आधी सत्तेत असणाऱ्या लोकांना केवळ अडचणींचा पाढा तोंडपाठ होता. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प रखडले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स लावले होते. मात्र, आम्ही सत्तेत आल्यावर सगळे स्पीड ब्रेकर्स हटवले. आता आपल्याला बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जायचं आहे. राज्यात आता अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. विमानतळामुळे अमरावतीचा विकास होतोय. या विमानतळामुळे नागरिक व शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.”

विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरेल, एकनाथ शिंदेंना विश्वास

“ज्या भागात चांगली वाहतूक व्यवस्था असते, जिथे रेल्वे व विमानसेवा उपलब्ध असते तिथला विकास जलदगतीने होतो, असं म्हणत शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, “राजाराम महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापूर विमानतळाचा विस्तार आपण केला आहे. ते आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होत आहे.

शिंदे म्हणाले, “अमरावती विदर्भातील शिक्षणाचं माहेरघर आहे. येथे विमानसेवा सुरू व्हावी अशी अमरावतीकरांची मागणी होती. ती मागणी आपण पूर्ण केली आहे. सध्या मर्यादित विमानफेऱ्या असल्या तरी जसजशी मागणी वाढेल तसतशी या विमानतळाची क्षमता व विमानफेऱ्या वाढवल्या जातील. हे विमानतळ अमरावतीकरांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.