मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी चांगलीच राजकीय टोलेबाजी केली. सामनाच्या रोखठोक सदरातून एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी आणि अमित शाहचे हस्तक असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्याला ही मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – “…त्यामुळे एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही”, पैठणच्या सभेत एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे आहे, अशी टीका माझ्यावर करण्यात आली. मात्र, याच साबनाने तुमची चांगली धुलाई केली आहे. शिंदे गट हे अमित शहा-मोदींचे हस्तक आहे, अशी टीकाही माझ्यावर करण्यात आली. मात्र, देशद्रोही असलेल्या याकुब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण तुम्ही केले. त्यामुळे याकुब मेमन आणि दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेले त्यांचे हस्तक झालेले केंव्हाही चांगले”, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेवरही टीका

यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही त्यांनी टोला लगावला. “जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेते व्हायचे होते. मात्र, अजित पवारांच्या दादागिरीमुळे त्यांना ते जमले नाही, त्यामुळे त्यांनी दिल्लीतील कार्यक्रमात अजित पवार यांना बोलू दिले नाही”, असे ते म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे हे सकाळी उठून नाही, तर सकाळपर्यंत जनतेसाठी काम करणारे आहे, असा टोला त्यांनी यावेळी सुप्रिया सुळे यांना लगावला.

हेही वाचा – भाजपाच्या सेवा सप्ताहावरून अजित पवारांचा खोचक टोला; म्हणाले, “मोदींचा फोटो लावल्याशिवाय…”

“आमदारांना मी नेलं नाही, त्यांनी मला नेलं”

“संदीपान भुमरेंनी सांगितलं की, मी राजकारणात दिलेला शब्द पाळतो म्हणून एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला. मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही. संदीपान भुमरेदेखील तसेच आहेत. एकदा ते माझ्याकडे आले, कधी आले ते मी सांगत नाही. शहाजीबापू म्हणाले आम्ही सगळे एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नेलं नाही, तर आम्हीच त्यांना नेलं. ही वस्तूस्थिती आहे,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.