Eknath Shinde : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या दरम्यान लाडकी बहीण योजना ही चांगलीच चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत १५०० रुपये दरमहा दिले जात आहेत. या योजनेचा लाभ कोट्यवधी महिलांना मिळाला आहे. २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यावर आम्ही आज ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे वळते केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) दिली. तसंच आशा भोसले यांनी या योजनेला विरोध करणाऱ्या सावत्र भावांना चपराक लगावली अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी आज रायगडमध्ये माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

“रायगडमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होतो आहे. आज एका क्लिकवर आम्ही आमच्या २ कोटी ३० लाख बहिणींच्या खात्यांत ऑक्टोबरच्या हप्ता दिला. लाडक्या बहिणी लाभांपासून वंचित राहणार नाहीत. काही लोक म्हणत होते की आचारसंहितेत ही योजना बंद पाडू. पण आमची देण्याची वृत्ती आहे. आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन हप्ते दिले आहेत. अॅडव्हान्समध्ये पैसे घ्यायचे हे पूर्वीचं सरकार होतं. विरोधक या योजनेला बदनाम करत होते. कोर्टात गेले होते, कोर्टानेही त्यांना चपराक दिली. ही योजना सर्वसामान्य, गोरगरीब लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे. काही लाडक्या बहिणींनी मला पत्रं पाठवली आमच्यासाठी हे पैसे गरोदर असताना उपयोगी पडत आहेत असं त्यांनी सांगितलं. आयर्नच्या गोळ्या, औषधं, सकस आहार यासाठी आम्हाला त्या पैशांचा उपयोग झाला” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सांगितलं.

हे पण वाचा- ‘लाडकी बहीण’सह सर्व योजना सत्ता आल्यास सुरू राहणार; देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची ग्वाही

आशा भोसले यांनीही या योजनेवरुन दुष्ट भावांना चपराक दिली आहे

आशा भोसले यांनीही या योजनेवरुन सावत्र आणि दुष्ट भावांना चांगली चपराक दिली आहे. लाडकी बहीण योजना कायम सुरु राहणार आहे. लाडके भाऊ युवा प्रशिक्षण योजनाही आम्ही सुरु केली. लेक लाडकी योजना सुरु केली. मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली आहे. योजनेत खोडा घालण्याचं काम सावत्र भाऊ करत आहेत. येत्या निवडणुकीत अशा खोडा घालणाऱ्या भावांना जोडा दाखवल्याशिवाय लाडक्या बहिणी शांत बसणार नाहीत असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

आशा भोसले यांनी काय म्हटलं होतं?

“लाडक्या बहिणींना महायुती सरकारनं जे १५०० रुपये दिले आहेत, त्यामागचा आनंद माझ्यापेक्षा इतर कुणाला कळणार नाही. हेच काम जर १९४७ साली कुणी केलं असतं. तर मी दोन वेळचं जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. कारण दुपारी मी जेवत नव्हते. माझे पती सायंकाळी आल्यानंतर आम्ही दोघं मिळून जेवत होतो.” अशी अतिशय भावनिक आठवण महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारमधील मंत्र्यांसमोर सांगितली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘अभिजात मराठी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा भोसले यांनी लाडकी बहीण योजनेचं कौतुक करताना त्यांच्या आयुष्यातील खडतर दिवसांची माहिती दिली.

आशा भोसले यांनी आणखी काय म्हटलं?

आशा भोसले पुढे म्हणाल्या, “आजच्या काळात कोटी, लाख यांची चर्चा होते. पण ज्या महिलांकडे जेवणासाठी थोडे पैसे नसतात त्यांच्यासाठी १५०० रुपये ही मोठी रक्कम असून महायुती सरकारने त्यांच्यासाठी मोठं काम केलं आहे. मी संगीत क्षेत्रात असले तरी मी एक गृहिणी आहे. एका महिलेला घरात जे काम करावं लागतं, ती सर्व कामं मी करते. घरातलं काम करता करता, मुलांना मोठं केलं. भोसले कुटुंब सांभाळलं. हे करता करता कधी ९२ वर्षांची झाले, हे ही कळलं नाही. कधी उपाशी राहून तर कधी जे आहे ते खाऊन दिवस काढले. पण कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. हाच माझा गुरुमंत्र होता.” असं आशा भोसले म्हणाल्या.