Eknath Shinde : महाराष्ट्राचं अराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. यावरुन राज्यभरात संतापाची लाट आहे. शिवभक्त संताप व्यक्त करत आहेत. तसंच विरोधकांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महायुती सरकारने केला असा आरोप गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने होतो आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी या प्रकरणी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? एक महत्त्वाची बैठक पार पडली. सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबत ही बैठक होती. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला दुःख देणारी आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं अराध्य दैवत आहे. नौदलाने एका चांगल्या भावनेने तो कार्यक्रम घेतला. छत्रपती शिवरायांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. या संदर्भात जी बैठक पार पडली त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नौदलाचे अधिकारी होते. असं एकनाथ शिंंदेंनी ( Eknath Shinde ) सांगितलं. शिवपुतळा कोसळल्याने वाद, वादळी वाऱ्यांमुळे दुर्घटना घडल्याचा दावा; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह (संग्रहित छायाचित्र) सरकारकडून दोन समित्या स्थापन आपण दोन संयुक्त समिती नेमल्या आहेत. एक समिती पुतळा दुर्घटनाग्रस्त कसा झाला? त्याची चौकशी करणार आहे. दुसऱ्या समितीत आपले तज्ज्ञ तसंच शिल्पकार, आयआयटी, नौदल अधिकारी आहेत. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिला पाहिजे त्यावर आमचं लक्ष्य आहे. त्याबाबत शिल्पकारांशी चर्चा करण्यात आली. आजही काही लोकांबरोबर बैठक गेली. मजबुतीने पुतळा उभा रहावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "आमची तज्ज्ञ समिती तिथलं वातावरण, वाऱ्याचा वेग, हवामान या सगळ्याचा विचार करुनच नवा पुतळा उभा करणार आहे. आता जो पुतळा उभा राहिल तो कायमस्वरुपी आणि भक्कम पुतळा असेल." असंही आश्वासन एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) दिलं. हे पण वाचा- शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शने मी शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार "झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुःख देणारी घटना घडली आहे. मला आता इतकंच सांगायचं आहे पण त्याचं राजकारण करणं हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. विरोधकांना अनेक विषय आहेत राजकारण करायला, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे. यावर कृपा करुन राजकारण करु नये. मी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं अराध्य दैवत आहेत त्यांच्या पायावर एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा मी त्यांची माफी मागायला तयार आहे, मला त्यात काहीही कमीपणा वाटणार नाही. कारण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन आम्ही राज्याचा कारभार करत आहोत. मी त्यांच्या पुतळ्यासमोर कायमच नतमस्तक होतो. विरोधकांना माझं हेच सांगणं आहे की या घटनेचं राजकारण करु नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा उभा कसा राहिल यासाठी विरोधकांनी सहकार्य केलं पाहिजे." असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.