Eknath Shinde : गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५०० रुपये? असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नागपूरमध्ये एकनाथ शिंदेंवर ( Eknath Shinde ) आणि भाजपावर जोरदार टीका केली. तसंच मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वराज्याशी कशी गद्दारी केली याचाही दाखला आपल्या भाषणात दिला. या सगळ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दिल्लीला जाऊन मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी करण्यासाठी हाती कटोरा घेऊन जाता ती भीक असते असा टोला एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका

“गद्दारांना ५० खोके आणि आम्हाला १५०० रुपये असं महिला सांगतात. २०१४ ला मोदी यांचा आम्ही प्रचार करतो होतो. १५ लाख देणार होते. त्याचे १५०० का झाले? लाडकी बहीण योजनेचे पैसे काय तुमच्या खिशातले नाहीत. जनतेचेच पैसे तुम्ही देत आहात.” असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला गद्दारांची कमाई नको आहे. मी म्हणजे कुणीतरी आहे असं त्यांना वाटतं आहे. दिल्लीत जाऊन मोदी-शाह यांच्यासमोर कटोरा महाराष्ट्र पसरणार नाही. मिंधे म्हणजे महाराष्ट्र नाही, गुलाबी जॅकेट म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची जनता माझ्या समोर बसली आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) जोरदार उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- “लाडकी बहिण योजना कुणीही कधीही बंद पाडू शकणार नाही”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

एकनाथ शिंदेंचं उत्तर काय?

“काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच.” असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

सर्वसामान्यांच्या योजना कायम राहणार – मुख्यमंत्री (संग्रहित छायाचित्र)

लाडक्या बहिणींना दिलेले पैसे तुम्हाला टोचतात

“आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे. कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत.” असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

भोकाड पसरणारे लोक आवडत नाहीत

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले… ते आधी लोकांसमोर कबूल करा.