Chetan Patil On Shivaji Maharaj Statue Collapse Incident : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी सरकार आणि नौदलाद्वारे संयुक्त समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले चेतन पाटील?

डॉ. चेतन पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी संवाद साधला. या पुतळ्याशी माझा काहीही संबंध नसून मी फक्त चुबतऱ्याचं डिझाईन दिलं होतं, असा दावा त्यांनी केला. “मी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे चबुतऱ्याचं डिझाईन दिलं होतं. मला चुबतऱ्यावर ११ टन वजन असेल, असं सांगण्यात आले होतं. त्यानुसार मी त्याचं डिझाईन बनवलं होतं. माझा मुख्य पुतळ्याशी संबंध नाही. त्या पुतळ्याचं काम ठाण्यातल्या एका कंपनीला दिलं होतं”, असं त्यांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्याबाबत विचारलं असता, “या घटनेनंतर आता माझ्यावर गुन्हा झाल्याचं कळतंय, मी योग्य ठिकाणी माझी बाजू मांडेन, यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही”, अशी प्रतिक्रियाही चेतन पाटील यांनी दिली.

हेही वाचा – मालवण राजकोट किल्ल्यावर नौदल अधिकारी, कोसळलेल्या शिव पुतळ्याची केली पाहणी

दोघांविरोधात गुन्हा दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक यांसह व गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे साहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेची कारण शोधण्यासाठी तांत्रिक संयुक्त समिती

दरम्यान, हा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्थापन करण्यात आली आहे. जबाबदारी निश्चित करणे हे समितीचं मुख्य काम असणार आहेत.

हेही वाचा – Narayan Rane : “पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला”, मालवणातील घटनेप्रकरणी नारायण राणेंचा दावा

मालवण येथील घटनेवरून राजकीय वातावरणही तापलं

दरम्यान, या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलं आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. हा पुतळा उभारण्याच्या कामात भष्ट्राचार झाला, असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं जात आहे.