सोलापूर : विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पुण्यात इंद्रायणी नदीत टाकताना तिच्या रडणाऱ्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिल्याच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेऊन आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि मृतांच्या वारसदारांना ५० लाख रुपये मदत मिळावी, अशी मागणी मृत विवाहितेच्या माहेर व सासरच्या मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मृत विवाहितेचे माहेर अक्कलकोट येथील आहे. त्याचे औचित्य साधून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या समवेत मृताच्या वारसदारांनी मुंबईत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. गेल्या २२ जुलै रोजी पुण्यात मावळ परिसरात विवाहित प्रेयसीचा गर्भपात करताना तिचा मृत्यू झाल्यानंतर प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसीचा मृतदेह इंद्रायणी नदीत टाकला होता. त्यावेळी तिच्या सोबत असलेली दोन्ही मुले रडू लागली असता त्या दोन्ही मुलांनाही उचलून नदीत टाकण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास होत असताना विवाहितेसह तिच्या दोन्ही निष्पाप चिमुकल्या मुलांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत. त्यासाठी एनडीआरएफच्या जादा तुकडीला पाठवावे, आरोपींना कठोर शासन व्हावे, घडलेला प्रकार अमानुष आहे. मृतांच्या वारसदारांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

हेही वाचा – सोलापूर : उजनी धरणात ३३ तासांत १८ टीएमसी पाणीसाठा वधारला

हेही वाचा – सोलापूर : पोलिसांचा ससेमिरा चुकविताना वाळू वाहतुकीचे वाहन पालथे; तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोर मृतांच्या वारसदारांनी आक्रोश करीत व्यथा मांडली. शिष्टमंडळात अक्कलकोट येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशपाक बळोरगी व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांचाही समावेश होता.