यवतमाळ : सततची नापिकी, दुष्काळ व कर्जमाफीला कं टाळून प्रभू रामा मोरे रा. आमणी खुर्द या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आमणी खुर्द येथे शनिवारी रात्री घडली.
त्यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. यंदा खरीप हंगामात उसनवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेऊन परेणी केली. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकत आहे. यावर्षीही हातचे पीक जाणार असून कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत ते होते. अशातच १५ सप्टेंबरला मध्यरात्री लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी नातेवाईकांच्या लक्षात ही बाब येताच महागाव पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली असा परिवार आहे.
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
गोंदिया : लाखनी तालुक्यातील पालांदूर-चौरस पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहारा येथील माधो बावाजी तरोणे (४५) याने शेतात कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
सकाळी तरोणे यांनी शेतात विष घेतले. त्यांना पालांदूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे त्यांनी जीवन संपवले. तरोणे यांच्यावर दीड लाखाचे कर्ज होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून उदरनिर्वाहासाठी ते टिप्पर चालकाचे काम करीत होते.