स्वतःच्या दोन लहान निष्पाप मुलांना विहिरीमध्ये पाण्यात फेकून त्यांचा खून करणाऱ्या गोकुळ जयराम क्षीरसागर राहणार आळसुंदे तालुका कर्जत या नराधम बापाला श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयाने भादवि कलम 302 अन्वये दोशी ठरवून जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील आळसुंदे या गावांमध्ये राहत असणारे गोकुळ जयराम शिरसागर व शितल गोकुळ शिरसागर या नवरा बायको मध्ये घरगुती कारणावरून वाद होत होता. त्यांना ऋतुजा गोकुळ क्षीरसागर वय आठ वर्ष व वेदांत गोकुळ क्षीरसागर वय चार वर्ष असे एक मुलगा व मुलगी होते. दिनांक 6 ऑगस्ट 2023 या दिवशी या दोन मुलांना गावांमध्ये कटिंग करून आणतो असे म्हणून नराधम बाप गोकुळ याने त्यांना घेऊन गेला आणि घराजवळील शेतामध्ये पाणी असलेल्या विहिरीमध्ये फेकून दिले. आणि त्यांचा अतिशय निर्दयी पणे खून केला.

हे ही वाचा…भाजपच्या माजी खासदारांकडून राष्ट्रवादी शरद पवार गटच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण, परस्पर विरोधी तक्रार

यानंतर याप्रकरणी श्रीगोंदा येथील सत्र न्यायालयामध्ये हा खटला चालवला. कर्जत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण पाटील यांनी या प्रकरणी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे पूरावे न्यायालयामध्ये सादर केले. सरकारी पक्षाकडून ॲड श्री केसकर यांनी व त्यांना मदतनीस म्हणून पोलीस अंमलदार अशा खामकर यांनी काम पाहिले. याप्रकरणी दोन्हीही पक्षांकडून युक्तिवाद होऊन अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश डी .पी. शिंगाडे यांनी आरोपी गोकुळ जयराम क्षीरसागर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.