सावंतवाडी : फेंगल चक्रीवादळाचा तडाखा समुद्रकिनारी भागात बसला असून गुलाबी थंडी अचानक गायब झाली आहे. तसेच आज मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर भल्या पहाटे पावसाचा शिडकावा झाला. या हवामानाचा फटका शेतकरी व बागायतदार यांच्यासह मनुष्यालाही बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ व ४ डिसेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आलेला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची, ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची व गडगडाट होवून विजा चमकण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून वर्तविण्यात आलेली होती. त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भल्या पहाटे पावसाचा शिडकावा झाला. मागच्या ४८ तासांत पुन्हा थंडीचा जोर ओसरला आहे. फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम अजूनही हवामानावर दिसून येत आहेत. फेंगल चक्रीवादळाचा समुद्रकिनारपट्टीलगतच्या भागांवर मोठा परिणाम दिसत आहे. ऐन थंडीत पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार खूश दिसत असतानाच अचानक हवामानातील बदल झाला. पावसाचा शिडकावा झाला त्यामुळे मोहर टिकविण्यासाठी बागायतदारांना प्रयत्न करावा लागेल.
© The Indian Express (P) Ltd