रत्नागिरी : शासनाने समुद्रातील दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास घातलेल्या बंदीविरोधात रत्नागिरीतील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयावर धडक दिली.
ड्रोनद्वारे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या हवाई गस्तीत दहा वावाच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणार्या मासेमारी नौकांची छायाचित्रे घेतली जातात आणि मच्छीमारांवर दंडात्मक कारवाई केली जाते. या संदर्भात लक्ष घालून न्याय मिळवून द्या, अशी विनंती मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली. या वेळी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देऊ, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांना दिले.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी १० जानेवारीपासून समुद्रकिनार्यावर ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट घेतली. मच्छीमार नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, काँग्रेस नेते दीपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी ड्रोन कारवाईसंदर्भात व्यथा मांडल्या. रत्नागिरी समुद्रकिनारा वगळता रायगड व इतर समुद्रकिनारी पाच वाव अंतराचा नियम आहे.
रत्नागिरीत दहा वाव पुढील अंतराच्या समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मच्छीमारांवर अन्याय आहे. कर्नाटकातील मलपी बंदरावर अद्ययावत नौका येथील मासळी खरवडून नेत आहेत. त्यांच्यावर धडक कारवाई होण्याची गरज आहे. यावर गेल्या दोन वर्षात मलपीच्या दोन अद्ययावत नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा खुलासा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कुवेसकर आणि परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी केला.
समुद्रात वारा असेल तर दहा वावाच्या बाहेर मासेमारी करणे फिशिंग नौकाना धोक्याचे असते. अशावेळी रत्नागिरी समुद्रात मासेमारी करण्याचे अंतर ५ वावाच्या पुढे असावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या संदर्भात निवेदन देण्यात यावे. ते निवेदन आयुक्त कार्यालयाला पाठवले जाईल, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी आश्वासन दिले.