Nitin Gadkari on secular thoughts: महाराष्ट्र संताची ही भूमी आहे. तसेच ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांचीही आहे. प्रत्येक व्यक्तीमधून जे चांगले आहे, ते आपण घेतले पाहीजे. छत्रपती शिवाजी महाराजांची विशेषतः अशी होती की, विजय मिळवल्यानंतर त्यांनी परधर्मीय पूजा मंदिरे उध्वस्त केली नाहीत. विरोधी पक्षात असलेल्या महिलांचा सन्मान केला आणि त्यांना घरी परत पाठवले. म्हणजे एक अर्थाने त्यांनी आदर्श राजा कसा असतो, हा परिचय करून दिला. सेक्युलर शब्दामध्ये सर्वधर्म समभावाचे सर्वात चांगले उदाहरण कुणाचे असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजे आहे. याचा मला विश्वास आहे. संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमानिमित्त नितीन गडकरी पुणे येथे उपस्थित असताना त्यांनी सेक्युलर शब्दावर जोर देऊन समाज विचारशून्यतेकडे चालला आहे, असे म्हटले.

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “आपल्या संविधानात सेक्युलर असा शब्द आलेला आहे. पण बरेच लोक त्याला धर्मनिरपेक्षता असे म्हणतात. पण इंग्रजी शब्दकोशात त्याचा अर्थ आहे सर्वधर्म समभाव. सर्व धर्माचा आपण आदर केला पाहीजे, हे त्यातील तत्व आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या भाषणात जे विचार मांडले, ते आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक आहेत. “तुमचा कुणाचाही ज्या धर्मावर आणि परमेश्वरावर विश्वास असेल, तो धर्म आणि परमेश्वर श्रेष्ठ आहे. हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे”, असे विवेकानंद म्हणाले होते. आपली भारतीय संस्कृतीमधील सहिष्णुता, सौहार्द, सौजन्यता, सहनशीलता ही विशेषता आहे.”

हे वाचा >> Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक

खालील व्हिडीओमध्ये १२.२० मिनिटाला गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विचार मांडले..

“सामाजिक समतेसह जोपर्यंत आर्थिक समानता येत नाही, तोपर्यंत आपण जे राष्ट्र निर्माणाचे स्वप्न पाहत आहोत, ते पूर्ण होणार नाही. हे करायचे असेल तर समाजामध्ये योग्य दिशेने प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कार या त्रिसुत्रीमध्ये लोकमानस, जनमानस घडवावे लागेल. जेणेकरून समाजात त्याचे प्रतिबिंब उमटेल”, असेही नितीन गडकरी म्हणाले.

हे ही वाचा >> Nitin Gadkari : “राजाने विरोधी विचार सहन केले पाहिजेत हीच लोकशाहीची परीक्षा”, नितीन गडकरींचा रोख कुणाकडे?

विचारभिन्नता नाही तर विचारशून्यता आपली समस्या

“देशातील वैचारिक परिस्थितीबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आज देशात विचारभिन्नता ही अडचण नसून विचारशून्यता सर्वात मोठी अडचण झाली आहे. आज रायटीस्ट (उजवे) किंवा लेफ्टीस्ट (डावे) राहिले नसून फक्त ऑपर्च्युनिस्ट (संधीसाधू) उरले आहेत आणि हीच आपली मोठी समस्या आहे. साहित्यिक, कवी, विचारवंताकडून अशी अपेक्षा आहे की, त्यांनी आपले विचार प्रखरपणे मांडले पाहीजेत. लोकशाहीमध्ये तर राजाच्या विरोधात कितीही परखड विचार मांडले तर राजाने ते स्वीकारले पाहीजेत, हीच लोकशाहीची परीक्षा असते”, असे विचार नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भाजपा नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने

भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे सेक्युलर विचार स्वीकारण्याचे आवाहन करत असताना दुसरीकडे भाजपाचे आमदार असलेले नितेश राणे आणि इतर काही नेते सातत्याने चिथावणीखोर विधाने करत आहेत. राणे यांच्या विधानावरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानेही हात झटकले आहेत. शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी विधाने केली जाऊ नयेत, असे सांगून एकप्रकारे भाजपाला इशारा दिला. मात्र त्याचवेळी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र नितेश राणे यांच्या विधानावर दखलपात्र अशी प्रतिक्रिया दिलेली नाही.