अलिबाग : शेतकरी कामगार पक्षाचे धुरा समर्थपणे संभाळणारे पाटील कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून, त्यांचा भाऊ माजी आमदार सुभाष पाटील हे देखील पक्ष सोडणार आहेत. येत्या १६ एप्रिलला ते आस्वाद पाटील, चित्रा पाटील, सवाई पाटील यांच्या समवेत भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या अडचणीत वाढ होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत अलिबागच्या उमेदवारीवरून पाटील कुटूंबात वादाची ठिणगी पडली. माजी आमदार सुभाष पाटील आणि जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. पण दोघांनाही डावलून शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी त्यांची सून चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील निवडणूक प्रचारापासून दूर राहिले. निवडणूकीच्या निकालावर त्याचा परिणाम झाला. पक्षांतर्गत नाराजी चित्रलेखा पाटील यांना महागात पडली. शिवसेनेचे महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे पक्षाची वाताहत सुरू झाली.

पक्षात सुभाष पाटील आणि आस्वाद पाटील यांना मानणारा मोठा गट आहे. हा गटही दोघांसोबत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष फूटीच्या उंबरठ्यावर आला आहे. शेकाप नेतृत्वाकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सुभाष पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले.

भाजपचे प्रदेशचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण नुकतेच अलिबागला आले होते. त्यांनी सुभाष पाटील यांची भेट घेतली आणि आस्वाद पाटील यांच्या समवेत भाजपमध्ये येण्याची विनंती केली होती. पक्षात तुमचा योग्य सन्मान राखला जाईल अशी हमी दिली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना जाहीर केले. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगले काम करत आहे, त्यामुळे सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचेही पाटील म्हणाले. पक्षाचे काही पदाधिकारी त्यांच्या समवेत भाजपमध्ये १६ एप्रिल रोजी प्रवेश करणार आहेत.