रत्नागिरी : रत्नागिरी आणि पुर्णगड भागातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी प्रकरणी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांकडून चौघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांकडून एकूण वाहनांसह सहा लाख सत्तावीस हजाराचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

रत्नागिरी तालुक्यातील पावस व रत्नागिरी शहर परिसरामध्ये मोबाईल टॉवर बॅटऱ्या चोरीचे अनेक प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरु होते. याबाबत पुर्णगड सागरी पोलीस ठाणे व रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी तात्काळ एक पथक तयार करुन या पथकाला मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या.

या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतीचे आधारे, राहुल कुंदन तोडणकर (वय- २९) रा. शिवलकरवाडी, आलावा जाकिमिऱ्या रत्नागिरी, शुभम नीलेश खडपे (वय-२४) रा. गोडावुन स्टॉप नाचणे रत्नागिरी, मुस्तफा गुड्डु पठाण (वय-२२) रा. गोडावुन स्टॉप नाचणे, रत्नागिरी, विकास महेश सुतार (वय-19) रा. थिबा पॅलेस गार्डनचे बाजुला, रत्नागिरी या चौघांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता पावस व रत्नागिरी या परिसरामध्ये विविध ठिकाणी मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्हा करणेकामी वापरलेली वाहने व साहीत्य असा एकूण ६ लाख २७०० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या चोरट्यां कडून एकूण पाच ठिकाणंचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Story img Loader