Girish Mahajan Maratha Reservation : “मनोज जरांगे पाटील माझ्यावरच टीका का करतात, हे मला कळत नाही”, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “मराठा समाजाने टिकणारं आरक्षण घ्यावं, असं मी मनोज जरांगे पाटील यांना सुचवलं होतं. परंतु, माझ्या त्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांना राग आला आहे, असं दिसतंय. आम्हाला (राज्य सरकार) फक्त इतकंच वाटतं की आमच्या सरकारने दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकावं. तसं झालं नाही तर समाजाची फसवणूक होईल, त्यामुळेच आम्ही चाचपणी करत आहोत,” असं म्हणत महाजन यांनी जरांगेंबरोबरच्या वादावर त्यांची भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडच्या काही सभांमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली होती. त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.

गिरीश महाजन म्हणाले, “मनोज जरांगे पाटील माझ्यावर टीका का करतात हे मला समजत नाही. मी त्यांना फक्त इतकंच म्हणालो होतो की मराठा समाजाने टिकणारं आरक्षण घ्यावं. आम्ही मराठा समाजाला गडबडीत आरक्षण दिलं आणि ते आरक्षण न्यायालयात टिकलं नाही, न्यायालयाने ते अवघ्या एका दिवसात निकाली काढलं तर उगाच समाजाची फसवणूक होईल. आमच्याकडून मराठा समाजाची फसवणूक व्हावी अशी आमची अजिबात अपेक्षा नाही. त्यामुळे मी मनोज जरांगेंना एवढंच म्हटलं की तुम्ही टिकणारं आरक्षण घ्या. त्यावरून त्यांना माझा राग आलेला दिसतोय.”

“वस्तुस्थितीला धरून बोलल्यामुळे जरांगेंना माझा राग आला”

टिकणारं आरक्षण घेण्याव्यतिरिक्त मी मनोज जरांगे पाटील यांना दुसरं काहीच बोललो नव्हतो. मी त्यांना पाच वेळा जाऊन भेटलो, त्यांच्याशी बोलणी करत होतो, राज्य सरकारचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. आरक्षणावर तोडगा कसा काढता येईल यावरही चर्चा केली. मी वस्तुस्थितीला धरून त्यांच्याशी चर्चा केली. आता वस्तुस्थितीला धरून बोलल्यामुळे जर त्यांना माझा एवढा राग येत असेल आणि ते प्रत्येक प्रचारसभेत ते माझ्यावर बोलत असतील तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार?

Manoj Jarnge Patil Nanded Rally
मनोज जरांगे पाटील

हे ही वाचा >> “इचलकरंजी मतदारसंघ पाकव्याप्त काश्मीर मानला पाहिजे”, हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य

“तुम्ही कितीही डाव टाका, पण जामनेरमध्ये…’, जरांगेंचा इशारा

हिंगोलीतील शांतता रॅलीत बोलताना मनोज जरांगे पाटील गिरीश महाजनांना इशारा देत म्हणाले होते, “तुमच्या एक गोष्ट लक्षात आली नाही. जामनेर विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे, हे विसरू नका.”